निर्यातदार बागा संकटात
By Admin | Updated: August 18, 2015 23:50 IST2015-08-18T23:50:15+5:302015-08-18T23:50:15+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई ज्या गावची डाळींब परदेशात निर्यात व्हायचे अशी कृषीक्रांती उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी घडवून आणली होती. मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी

निर्यातदार बागा संकटात
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
ज्या गावची डाळींब परदेशात निर्यात व्हायचे अशी कृषीक्रांती उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी घडवून आणली होती. मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे गावातील एक हजार एक्कर वरील डाळींब, अंबा व आद्रक मोडून काढण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. फळबागा जोपासण्यासाठी निर्माण झालेली दीडशे शेततळी ही पाण्याअभावी आटली आहेत. जिथे गावालाच टंँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. तिथे फळबागा जोपासायच्या कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उंदरी हे ४२०० लोकसंख्येचे गाव आठ वर्षांपूर्वी पारंपारिक शेतीला फाटा देत. नवीन तंत्रज्ञान अवगत करून शेतीत विविध प्रयोग साकारण्यासाठी युवक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. शासनाच्या राष्ट्रीय फलोद्यान योजनेच्या माध्यमातून गावात सातशे एक्कर डाळींब, शंभर एक्कर केशर अंबा,दोनशे एक्कर आद्रक व चिक्कू अशा एक हजार एक्करवर फळबागा उभ्या राहिल्या. सन २००९ पासून गावात कृषिक्रांती झाली. अन् गावातील दोनशे शेतकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेतला. तीन वर्षात सातशे एक्कर मध्ये डाळींब, शंभर एक्कर मध्ये केशर अंबा, दोनशे एक्कर मध्ये आद्रकाची लागवड झाली.
फळबाग योजनेच्या माध्यमातून गावात तीन वर्षात दीडशे शेततळी निर्माण झाली. विहिर,इंधन विहिर व शेततळ्याच्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे फळबागा जोपासल्या. विविध प्रकारच्या डाळींबाचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात निघाले. उंदरीच्या डाळींबाला परदेशात निर्यातीद्वारे मागणी वाढली.
प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांचा भावही मिळाला तर भारतात दिल्ली, बेंगलोर, झारखंड इथेही माल विक्रीसाठी जाऊ लागला. शेतकऱ्यांच्या कष्टाला यश आले. या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली.
डाळींबाच्या बागा जोपासतांना तेल्याबिमारी या महाभयंकर किडीवर मात करूनही या बागा उभ्या राहिल्या. मात्र गेल्या चार वर्षांपासून पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे गाव व परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले.
शक्य होईल तोपर्यंत टँकरद्वारे पाणी देऊन मोठ्या कसरतीने बागा जोपासल्या. मात्र आता जलस्त्रोतच निकामी झाल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. पाण्याअभावी या फळबागा मोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पुढील पंधरा ते वीस
वर्षांचे होणार नुकसान
फळबाग लागवडीसाठी मोठा खर्च येतो. हा खर्च करीत मोठ्या जिकीरीने फळबागांची लागवड झाली. एकदा लावलेल्या फळबागेचे उत्पादन किमान १५ ते २० वर्षे घेता येते. या फळबागांची लागवड ४ ते ५ वर्षापूर्वीच झालेली असल्याने व आता पाण्याअभावी फळबाग मोडण्याची वेळ आल्याने पुढील पंधरा ते वीस वर्षांचे नुकसान व मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा बागायतदार शेतकरी प्रदीप ठोंबरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.
पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना काही मदत येईल का? याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून मदत करावी व शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान टाळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.
उंदरी या गावाला गेल्या चार महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. एका टँकरद्वारे दररोज गावात चार खेपा करून गावची तहान भागवली जाते. गावालगत असलेला कारंजा लघु प्रकल्प ही पाण्याअभावी तीन वर्षांपासून कोरडा आहे. अशा स्थितीत जिथे पिण्याच्या पाण्याचीच भ्रांती तिथे फळबागा जोपासायच्या कशा? अशी प्रतिक्रिया पं. स. सदस्य तथा उंदरीचे बागायतदार सुदाम पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.