महागड्या टँकरची औरंगाबादकरांना झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:59 IST2019-03-06T23:59:02+5:302019-03-06T23:59:24+5:30

उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Expensive tanker Aurangabad! | महागड्या टँकरची औरंगाबादकरांना झळ!

महागड्या टँकरची औरंगाबादकरांना झळ!

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : मनपाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत

औरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
शहराच्या आसपास किमान २५० वसाहतींना महापालिका पाणी देत नाही. यातील काही वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. ज्या नागरिकांनी टँकरसाठी अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत, त्यांनाच टँकरद्वारे दोन दिवसाआड दोन ड्रम पाणी देण्यात येते. मनपाकडून फक्त पिण्यासाठी म्हणून पाणी देण्यात येते. वापरण्यासाठी आज हजारो नागरिकांना पाणी मिळत नाही. नाइलाजास्तव नागरिकांना खाजगी टँकर मागवावे लागते. मार्च महिन्याला सुरुवात होताच टँकर लॉबीनेही दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. किलोमीटरनुसार याचे दर आहेत. जेथे टँकर भरण्यात येते तेथून अंतर मोजण्यात येते. जिथे पाणी नेऊन टाकायचे आहे, तेथील अंतर जास्त असल्यास दरही सर्वाधिक असतात. दोन हजार लिटरचे टँकर २ कि.मी. अंतरापर्यंत कोणी मागविले तर ३५० रुपये दर आकारला जातो. ४ कि.मी. अंतर असल्यास ४०० रुपये. किलोमीटर जसजसे वाढेल तसे शंभर रुपये वाढत जातात, असे एका टँकर विक्रेत्याने सांगितले. शहराच्या आसपास ज्या नवीन वसाहती तयार झाल्या आहेत, त्या भागातील विंधन विहिरींचे पाणी आता आटले आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.
मनपाचे ९४ टँकर
महापालिकेमार्फत सध्या ९४ टँकर सुरू आहेत. नागरिकांनी पैसे भरून टँकर मागविले तर दोन ते तीन तासांमध्ये पाणी देण्यात येते. पाच हजार लिटरचे टँकर ८९० रुपयांमध्ये, तर १० हजार लिटरसाठी १७८० रुपये द्यावे लागतात. गुंठेवारी भागातील असंख्य नागरिक पैसे भरून मनपाकडून पाणी घेतात. एका नागरिकाकडून दरमहा ३६६ रुपये भरून घेण्यात येतात. महिन्यातून १८ ते २० ड्रम पाणी मनपाकडून देण्यात येते. १८ ते २० नागरिकांनी ग्रुप तयार करून पाणी घ्यावे, अशी मनपाची अट आहे.
खाजगी टँकरचे दर
२ हजार लिटर
३५० ते ४००
.........................
५ हजार लिटर
१ हजार रुपये
.......................
१० हजार लिटर
१२०० ते १५००

Web Title: Expensive tanker Aurangabad!