एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत आलो, त्यांच्यासोबतच राहणार; अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:53 IST2022-06-26T15:49:23+5:302022-06-26T15:53:01+5:30
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड शहरात रविवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन पासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत आलो, त्यांच्यासोबतच राहणार; अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ रॅली
सिल्लोड: काँग्रेस सोडली त्यावेळी ८ महिने कोणताही पक्ष नव्हता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आलो होतो. ते घेतील ते निर्णय आम्हाला मान्य आहे, आम्ही एकनाथ शिंदे सोबतच राहणार, असा खुलासा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड येथे आयोजीत रॅली व सभेला संबोधीत करताना केला. अब्दुल सत्तार सभेला आले नाही मात्र त्यांच्या भावना मी आपल्या पर्यंत पोहचवीत आहे असेही ते म्हणाले
एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड शहरात रविवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन पासून रॅली काढण्यात आली, या रॅलीचा समारोप नीलम चौकात झाला. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
शक्ती प्रदर्शन....
सिल्लोड शहरात यावेळी अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मात्र या रॅली व सभेत कुणावरही टीका करण्यात आली नाही. शांततेने ही रॅली काढण्यात आली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हवामान खराब असल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडला आले नाही, असा खुलासा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना समीर म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही नेते विकास निधी देताना दुजा भाव करत असल्याने विकास काम करण्यास अडथळे निर्माण होत होते. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी दिला. सुख दुःखात सर्व आमदारांच्या पाठीशी शिंदे उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने आमदार त्यांच्या पाठीशी आहेत.
अब्दुल सत्तार हे संघर्षातुन निर्माण झालेले नेते
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सत्तार यांनी राजकारणाची सुरुवात केली व केबिनेट व राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. आम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरणार नाही, यापुढे जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जाऊ. जनता आमच्या पाठीशी आहे असे ही समीर म्हणाले. यावेळी सिल्लोड शहर, ग्रामीण, अजिंठा येथील पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, सीताराम मेहेत्रे, अजित विसपुते,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी एसआरपीची एक तुकडी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.