दुष्काळामुळे खवा उद्योगही आला अडचणीत
By Admin | Updated: July 11, 2016 00:19 IST2016-07-11T00:07:22+5:302016-07-11T00:19:26+5:30
बाळासाहेब स्वामी , ईट दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा-पाणीटंचाईला कंटाळून अनेक पशुपालकांनी जनावरे विकली आहेत़ परिणामी तालुक्यातील दुधाच्या उत्पादनात घट झाली असून,

दुष्काळामुळे खवा उद्योगही आला अडचणीत
बाळासाहेब स्वामी , ईट
दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा-पाणीटंचाईला कंटाळून अनेक पशुपालकांनी जनावरे विकली आहेत़ परिणामी तालुक्यातील दुधाच्या उत्पादनात घट झाली असून, खवा उद्योगही अडचणीत आला आहे़ तालुक्यातील ३० ते ३५ टक्के व्यावसायिकांनी खवा भट्ट्या बंद करून इतर व्यवसाय सुरू केल्याचे चित्र आहे़
भूम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला होता़ भूम येथील तालुका दूध संघ बंद पडल्यानंतर खासगी दूध संकलन केंद्रे व खवा भट्ट्या उदयाला आल्या़ खवा भट्ट्यांमध्ये अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी तेथे दूध घालण्याकडे ओढा दिला होता़ तालुक्यातील गावा-गावात खवा भट्ट्या सुरू झाल्या आणि खवा उत्पादनात भूम तालुक्याचे राज्याच्या नकाशावर आले़ दोन वर्षापूर्वी तालुक्यात दररोज तब्बल ७ हजार किलोचा खवा तयार केला जात होता़ मात्र, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, सध्या दिवसाकाठी ५ हजार किलोचा खवा तयार होत आहे़ या खव्यापासून बनविण्यात येणारा पेढा हा नाशिक, वणी, त्र्यंबकेश्वर, डहाणू, पाली, रांजणगाव, पंढरपूर आदी विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विक्रीसाठी जातो़ शिवाय इतर राज्यातील अनेक खवय्ये येथून पेढा नेतात़ तालुक्यात सध्या १७० च्या आसपास खवाभट्ट्या आहेत. खवा भट्ट्यांमध्ये दिवसाकाठी ५०० रुपये मजुरी दिली जाते़ तर पेढा तयार करणाऱ्या कारखान्यात ५० च्या जवळपास युवकांना रोजगार मिळाला आहे़ तर पेढा विक्रीतून एक हजार युवकांना रोजगार मिळाला आहे़ मात्र, दोन वर्षापूर्वीची परिस्थिती राहिली नसल्याने खवा व्यवसाय अडचणीत आला आहे़ चाऱ्याच्या प्रश्नामुळे अनेकांनी जनावरे विकली आहेत़ सध्या कडब्याची पेंढी २५ रुपयांना मिळत आहे़ तर दुधाला ३० ते ३५ रुपये भाव मिळत आहे़ त्यामुळे अनेकांनी जनावरे विकली आहेत़ दूध उत्पादनात घटल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे़ यामुळे मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे़