लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाºयांमध्ये मीनाताई ठाकरे स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपताच जोरदार फ्रीस्टाईल मारामारी झाली. या फ्रीस्टाईलची दखल थेट शिवसेना सचिवांनी घेऊन उपशहर संघटक राखी सुरडकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईमुळे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील कुरघोडीचे राजकारण अधिकच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.शिवसेना महिला आघाडीत पदाचे वाटप झाल्यापासून धुसफूस सुरू होती. श्रावण महिन्यानिमित्त एमजीएममध्ये झालेल्या कार्यक्रमात उपशहर संघटक राखी सुरडकर आणि मंजूषा नागरे यांच्यात बाचाबाची झाली होती. यात सुरडकर या दानवे गटाच्या, तर नागरे या खैरे गटाच्या मानल्या जातात. या जिल्हा संघटक असलेल्या रंजना कुलकर्णी आणि नागरे यांची मैत्री महिला आघाडीत सर्वश्रुत आहे. गुलमंडीवर मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघींची खा. खैरे यांच्यासमोरच बाचाबाची झाली होती. तेव्हा खैरे यांनी मध्यस्थी करून वाद घालण्याची ही जागा नसल्याचे दोघींना सांगितले. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. सर्व पदाधिकारी निघून गेल्यानंतर राखी सुरडकर यांनी मंजूषा नागरे यांना पाठीमागून येऊन केस पकडून मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे रंजना कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भर रस्त्यात माँ साहेबांचा कार्यक्रम संपल्यानंतर केलेल्या या फ्रीस्टाईलची तक्रार थेट महिला आघाडीच्या उपनेत्या आणि संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या शिस्तीचा भर रस्त्यात पंचनामा करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिकाही रंजना कुलकर्णी यांनी वरिष्ठांकडे मांडल्याचे समजते. या तक्रारीवरून सचिव अनिल देसाई यांनी राखी सुरडकर यांची हकालपट्टी केल्याचे पक्षाच्या मुखपत्रातून जाहीर केले. यात विशेष म्हणजे शिवसेनेत किरकोळ वादासंदर्भात जिल्हाप्रमुखच निर्णय घेतात. मात्र यावेळी थेट मातोश्रीच्या आदेशावरून ही कारवाई झाल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.हकालपट्टी करण्यात आलेल्या राखी सुरडकर या दानवे समर्थक म्हणून ओळखल्या जातात. ‘दादा’ पाठीशी असल्यामुळे सुरडकर कोणालाही घाबरत नव्हत्या. कोणता आदेशही मानत नव्हत्या, असेही रंजना कुलकर्णी यांनी सांगितले. यात विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी दानवे गटाला ताकद दिलेली आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्यात वाद झाल्याचे बोलले जाते. यामुळेच देसार्इंमार्फत खैरे गटाने दानवे गटावर कुरघोडी केल्याची कुजबूज सुरू आहे. हकालपट्टीचा निर्णय किरकोळ असला तरी भविष्यातील कुरघोडीची ही नांदी ठरणार आहे. याविषयी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
सेना महिला आघाडीत खदखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:57 IST