Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 17:25 IST2021-07-19T16:51:42+5:302021-07-19T17:25:11+5:30
Aashadhi Ekadashi : Saint Eknath Maharaj's palakhi, Paithan : ४२३ वर्षांची पायीवारी प्रथा असलेला नाथांचा पायी पालखी सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे.

Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप
पैठण : आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीचे शिवशाही बसने सोमवारी नाथमंदिरातून मोजक्या वारकीऱ्यांसह पंढरपुरकडे प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसापासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदीरात मुक्कामी होत्या. दरम्यान विठ्ठल दर्शनाची आस असणाऱ्या वारकऱ्यांना यंदा विठु माऊलीचे दर्शन घडणार नसल्याने पादुका प्रस्थान समयी वारकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले. ( Aashadhi Ekadashi : Departure of Saint Eknath Maharaj's palakhi to Pandharpur from Paithan )
४२३ वर्षांची पायीवारी प्रथा असलेला नाथांचा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दोन शिवशाही बसने सोमवारी ४० मानकऱ्यांसह पादुका पालखीस नाथमंदिरातून वाजत गाजत भानुदास-एकनाथ अशा गजरात निरोप देण्यात आला. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदीरात पादुका आरती करण्यात आली. या वेळी संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, रेखाताई कुलकर्णी, अरूण काळे, खुशाल भवरे, श्रीकृष्ण कुलकर्णी, जिल्हा दूध संघाचे चेअरमन नंदलाल काळे, नाथ संस्थांनचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, शहर प्रमुख तुषार पाटील, नगरसेवक भूषण कावसानकर, ईश्वर दगडे, आदी सह वारकरी उपस्थित होते.
मंत्री भुमरे व पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरातून पादुका शिवशाही बसमध्ये स्थानापन्न करण्यात आल्या, यावेळी उपस्थित भाविकांनी भानुदास-एकनाथ नामाचा गजर करून पालखी असलेल्या बसवर पुष्पवृष्टी केली. बसला पारंपरिक पालखीस जसे सजवतात तसे फुला पानाने आकर्षक रित्या सजविण्यात आले होते. बसमधून पादुका निघाल्यानंतर रस्त्यात दुतर्फा उभे राहून वारकरी, भाविक मनोभावे अंतकरणातून हात जोडून दर्शन घेताना दिसून आले. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथाच्या पादुका असलेल्या बसने पैठण तालुक्याच्या सीमेपर्येंत प्रवास केला. पालखी असलेल्या बस सोबत उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, केअर टेकर ऑफिसर म्हणून तर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ सीमा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक बस सोबत रवाना झाले. पालखी बस सुरक्षेसाठी पोलीसांची व्हँन पालखी सोबत देण्यात आली असून पोलीस व्हँन बस सोबत पैठण ते पंढरपूर व पंढरपूर ते पैठण अशी राहणार आहे असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.
वारी चुकल्याने वारकऱ्यांना भरून आले
''आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग', 'विसरू नका मज ' असे पांडुरंगाचे म्हणणे आहे. दुसरीकडे शासनाने प्रतिबंध लादून आमची वारी बंद केली आहे. आता आम्ही कशी वारी करायची अशा उद्विग्न प्रतिक्रिया नियमितपणे पायी वारीस जाणाऱ्या वारकऱ्यातू आज उमटल्या. नाथांच्या पालखीसोबत अनेक वर्षांपासून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वारी चुकल्याने पालखी प्रस्थान समयी त्यांना भरून आले होते. नाथांच्या पादुका पंढरपूरला रवाना झाल्या तेव्हा वारकऱ्यांची तगमग व घालमेल स्पष्ट दिसून येत होती. आमचे पंढरपूरला येणे होणार नसल्याने बा विठ्ठला आता तुम्हीच आम्हाला भेटायला या अशी भावना वारकरी व्यक्त करत होते.