सोन्याचे भाव घसरूनही मागणी कमीच

By Admin | Updated: May 24, 2014 02:10 IST2014-05-24T02:01:54+5:302014-05-24T02:10:38+5:30

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅममागे तब्बल २ हजार रुपयांनी कमी झाले.

Decrease in gold prices also decreased demand | सोन्याचे भाव घसरूनही मागणी कमीच

सोन्याचे भाव घसरूनही मागणी कमीच

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅममागे तब्बल २ हजार रुपयांनी कमी झाले. सोन्याने मागील १० महिन्यांतील नीचांक गाठल्याने बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सराफा बाजारात आजही तुरळकच ग्राहकी दिसून आली. आणखी भाव कमी होतील या आशेने ग्राहकांनी ‘थांबा आणि पाहा’ अशी नीती अवलंबिली असल्याने ज्यांना सोने खरेदी करणे आवश्यक आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य किंचित वाढले, तर दुसरीकडे सोने व चांदीच्या किमतीत घट झाली. गुरुवार, १५ मे रोजी औरंगाबादेत सोने ३०,३०० रुपये प्रती १० ग्रॅम विक्री झाले होते. शुक्रवार, १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि सोन्याचे भाव दिवसभरात १३०० रुपयांनी कमी होऊन २९००० रुपये प्रती १० ग्रॅमवर आले. दोन दिवसांपूर्वी चांदीचा भाव ४२ हजार रुपये प्रतिकिलो होता. शुक्रवारी सोन्याबरोबर चांदीचे भाव हजार रुपयांनी कमी होऊन ४१ हजार रुपये प्रतिकिलोवर आले. २१ मे रोजी दिवसभरात ८०० रुपयांनी सोन्याचे भाव कमी होऊन २८,३०० रुपये प्रती १० ग्रॅमपर्यंत खाली आले. यासंदर्भात गिरधरभाई जालनावाला यांनी सांगितले की, मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव तब्बल २ हजार रुपयांनी उतरले. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव २७ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतील. वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापिका माधुरी घाटगे यांनी सांगितले की, मागील आठवडाभरात हजार ते दीड हजार रुपयांनी सोन्याचे भाव कमी झाले. मात्र, त्या तुलनेत सोने, दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा दिसून आला नाही. पूर्वी १०० ते २०० रुपयांनी जरी सोन्याचे भाव कमी झाले तरीही ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत असे. जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी जुगलकिशोर वर्मा म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून ग्राहक फक्त फोनवर सोन्याच्या किमतीबद्दल चौकशी करीत आहेत. काही जण दुकानात येऊन दागिने पाहून जात आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे तेच सोने व दागिने खरेदी करीत आहेत. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावरील वाढती तूट लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने जुलै २०१३ मध्ये सोने आयातीवर अनेक निर्बंध लादले होते. केंद्र सरकारनेही वेळोवेळी मौल्यवान धातूवर आयात शुल्कीही वधारते ठेवले होते. तसेच खुद्द यूपीएच्या अर्थमंत्र्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका, असे आवाहनही केले होते.

Web Title: Decrease in gold prices also decreased demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.