दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप
By Admin | Updated: August 2, 2014 01:32 IST2014-08-02T00:20:01+5:302014-08-02T01:32:44+5:30
पालम : शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू हंगामासाठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली आहे.

दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप
पालम : शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू हंगामासाठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली आहे.
पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमधून दरवर्षी खरिपाच्या हंगामासाठी पीककर्ज दिल्या जाते. शेतकऱ्यांना शेतातील पेरणीसाठी बी बियाणे, रासायनिक खते व औषधांसाठी पीककर्जाच्या रकमेचा उपयोग होत असतो. ऊस, हळद, केळी, कापूस यासह विविध पिकांसाठी कर्ज दिल्या जाते. मागील महिन्यापासून शेतकरी पीककर्जाचे प्रस्ताव तयार करीत रांगा लावत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी रुपयांचे पीककर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेऊन पीककर्जाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पुढाकार घेतला आहे. या बँकेपाठोपाठ स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पालम शाखेनेही पीक कर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जवळपास ३०० शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळण्यास मदत झाली आहे. यासाठी शाखा व्यवस्थापक हाडबलवार, क्षेत्रीय अधिकारी वासरीकर, लेखापाल रामगीरवार, उत्तरवार, महाराज आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना ठेंगा
तालुक्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे. स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या शाखेने मात्र शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. यावर्षी या बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले आहे. या बँकेतील शाखा व्यवस्थापक रजेवर गेल्याने पीक कर्ज वाटपाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
एसबीआय बँकेला गाव जोडावे
पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना दत्तक बँका पीककर्जाचे वाटप करीत आहेत. परंतु आरखेड हे गाव पीककर्जापासून वंचित राहिलेले आहे. हे गाव एचडीएफसी बँकेला दत्तक देण्यात आले आहे. या बँकेची शाखा पालम शहरात नाही. यामुळे ४० कि.मी. हेलपाटे करून गंगाखेड शहर गाठण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे पीक कर्ज काढण्यासाठी शेतकरी या बँकेकडे जात नाहीत. शेतातील कामे सोडून हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने आरखेड येथील शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. आरखेड हे गाव स्टेट बँकेच्या पालम शाखेला दत्तक देण्याची आवश्यकता आहे. याकडे जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.