मनपाचे आश्वासन करवसुलीपुरतेच
By Admin | Updated: May 21, 2014 01:13 IST2014-05-21T01:03:14+5:302014-05-21T01:13:21+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेने व्यापार्यांना दंड व व्याज न आकारता मालमत्ताकर वसुलीचा धाडसी निर्णय घेतला; पण त्या बदल्यात बाजार समितीत सुविधा पुरविण्याचे आश्वासन पाळले नाही.
मनपाचे आश्वासन करवसुलीपुरतेच
औरंगाबाद : महानगरपालिकेने व्यापार्यांना दंड व व्याज न आकारता मालमत्ताकर वसुलीचा धाडसी निर्णय घेतला; पण त्या बदल्यात बाजार समितीत सुविधा पुरविण्याचे आश्वासन पाळले नाही. यामुळे अडत व्यापार्यांत नाराजी आहे. महानगरपालिकेचा मालमत्ताकर भरण्यास जाधववाडीतील अडत व्यापारी तयार होते. वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना त्यांनी निवेदनही दिले होते. जाधववाडीत महानगरपालिका गेल्या १६ वर्षांपासून कोणतीच सुविधा पुरवत नाही. बाजार समिती प्रशासनच येथे विहिरीद्वारे पाणीपुरवठा, साफसफाई, पथदिवे आदी सुविधा देत आहे. कोणतीच मूलभूत सुविधा न देताही महानगरपालिका जाधववाडीतील अडत व्यापार्यांकडून मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रयत्न करीत होती. कर भरण्यास व्यापार्यांनी कधीही विरोध केला नाही; परंतु मागे मालमत्ताकर वेळेत न भरल्याने आकारलेला दंड व व्याज माफ करावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र, याआधीच्या कोणत्याच आयुक्त व मालमत्ताकर वसुली अधिकार्याने या मागणीवर ठोस निर्णय घेतला नाही. व्यापार्यांनी वेळोवेळी दिलेले निवेदन व मालमत्ताकर वसुलीत मनपाकडूनच झालेल्या दिरंगाईचा विचार करीत आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी धाडसी निर्णय घेत जाधववाडीतील अडत व्यापार्यांना याआधी आकारलेला मालमत्ताकरावरील दंड व व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. अडत व्यापार्यांनीही यास प्रतिसाद देत मार्च २०१५ पर्यंतची मालमत्ताकराची थकीत रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला व पहिल्या टप्प्यात दीड ते दोन कोटींची रक्कम मनपाकडे भरलीही. यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संजय पहाडे म्हणाले की, बैठकीत मनपा आयुक्तांनी आश्वासने दिली होती. यात मार्केट यार्डमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करणे, साफसफाई कर्मचारी नेमणे, पथदिवे सुरू करणे, कोंडवाड्यासाठी कर्मचारी नेमणे या बाबींचा समावेश होता. आश्वासने देऊन दोन महिने उलटले तरी महानगरपालिकेने आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काही केले नाही. या आवश्यक सुविधा न दिल्यास एलबीटीप्रमाणे मालमत्ताकर प्रश्नावर असहकार आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा पहाडे यांनी दिला.