Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:17 IST2020-06-14T12:13:26+5:302020-06-14T12:17:43+5:30

औरंगाबाद - दिल्ली विमानसेवा : विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली, उद्योजकांच्या प्रयत्नांना यश

coronavirus Unlock : Airlines take off from Aurangabad from June 17 | Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

ठळक मुद्देकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विमानतळावरून १७ जूनपासून औरंगाबाद - दिल्ली विमानसेवेचे उड्डाण होणार आहे. यासाठी इंडिगोने बुकिंग सुरू केली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. जुलैऐवजी जूनपासून औरंगाबादहुन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. याविषयी काय निर्णय घेण्यात येतो, याकडे लक्ष लागले होते.

मुंबईसह विविध शहरांतून २५ मे पासून विमानांचे उड्डाण सुरू झाले. परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. औरंगाबादची विमानसेवा वेटिंगवर होती. दुसरीकडे दिवसाला सुमारे तीनशे रुग्णांची वाढ होणाऱ्या पुणे शहरातून विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, दुसरीकडे दिवसभरात अवघे काही रूग्ण वाढणाऱ्या औरंगाबादेत विमानसेवा का सुरु केली जात नाही, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला होता. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: coronavirus Unlock : Airlines take off from Aurangabad from June 17