Coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये ९ तासांत ५ मृत्यू; आतापर्यंत ५५ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 15:59 IST2020-05-25T15:58:54+5:302020-05-25T15:59:29+5:30
यात सिल्लोड, कटकट गेट, रोहीदासनगर, कैलासनगर येथील महिलांचा तर न्यायनगरातील पुरुषाचा समावेश आहे.

Coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये ९ तासांत ५ मृत्यू; आतापर्यंत ५५ बळी
औरंगाबाद : कोरोनाबधित गंभीर असलेल्या चार महिलांसह एका पुरुषाचा गेल्या ९ तासांत मृत्यू झाला आहे. गंभीर असलेल्या या रुग्णांचा रविवारी सायं. ९.३० ते सोमवारी सकाळी ६.३० दरम्यान हे ५ मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. यात सिल्लोड, कटकट गेट, रोहीदासनगर, कैलासनगर येथील महिलांचा तर न्यायनगरातील पुरुषाचा समावेश आहे.
कटकटगेट येथील ५५ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. न्यायनगर, गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री ९.३५ वाजता, रोहिदासनगर येथील ३४ वर्षीय महिलेला मध्यरात्री एक वाजता, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे ३.१५ वाजता मृत्यू झाला. तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.
शहरात १३०१ रुग्ण, ५५१ जणांवर उपचार सुरु
सोमवारी (दि २५) सकाळच्या सत्रात १६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या १३०१ झाली आहे. शहरातील सुभाषचंद्र बोस नगर ( एन ११, हडको)- ४, भवानी नगर- २, रोशन गेट -१ , हुसेन कॉलनी-१, बायजीपुरा- १, इटखेडा (पैठण रोड)- १, अल्तमश कॉलनी- १, जवाहर नगर (गारखेडा परिसर ) -१, शाह बाजार-१, मयूर नगर ( एन-6, सिडको)- १, राम नगर ( एन २ ) - १, गजानन मंदिर परिसर - १ या भागात कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १० महिला आणि ६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
११ रुग्णांना सुटी
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील ११ रुग्णांना घाटीतून सुटी देण्यात आली.