CoronaVirus : रुग्णसंख्येत होतेय घट; कोरोनाला हरविण्याकडे औरंगाबादची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:48 IST2021-05-07T16:42:31+5:302021-05-07T16:48:40+5:30

CoronaVirus: गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला.

CoronaVirus: Decreased in corona patients; Aurangabad on its way to defeating Corona | CoronaVirus : रुग्णसंख्येत होतेय घट; कोरोनाला हरविण्याकडे औरंगाबादची वाटचाल

CoronaVirus : रुग्णसंख्येत होतेय घट; कोरोनाला हरविण्याकडे औरंगाबादची वाटचाल

ठळक मुद्देशहरात रुग्ण कमी होत असताना ग्रामीण भागांत रुग्णसंख्येचा चढता क्रम कायमब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्तीचा फायदा

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन महिने कोरोनाच्या हाहाकारानंतर आता शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. रोज निदान होणाऱ्या शहरातील रुग्णसंख्येत घट होत असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी केवळ ३० टक्के रूग्ण शहरातील आहेत. तर तब्बल ७० टक्के रूग्ण ग्रामीण भागातील आहे. कोरोनाला हरविण्याकडे शहराची वाटचाल सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात रुग्णांची अद्यापही संख्या वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाने अक्षरश: कहर केला. अवघ्या काही दिवसांत ५० हजारांवर रुग्णांची भर पडली. रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी भरून गेल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला. जिल्ह्यात ५ मे रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार ४४४ होती. यात शहरातील रुग्णांची संख्या फक्त २ हजार ७८५ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ हजार ६५९ आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात राेज अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तर शहरात रुग्ण कमी होत असल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडणे आदींमुळे शहरात कोरोना आटोक्यात येत असल्याची स्थिती आहे.

३६ दिवसांत १० हजारांवरून २ हजारांवर
३१ मार्च रोजी शहरात १० हजार ९१५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी २ हजार ७८५ झाली. त्या उलट ग्रामीण भागात ३१ मार्च रोजी ४ हजार ६५५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी ६ हजार ६५९ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

ब्रेक द चेन, लसीकरण, स्वयंशिस्तीचा फायदा
ब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. परंतु आपल्याला गाफील राहता येणार नाही. धोका अजूनही आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी आरोग्य सुविधेत सुधारणा, आणखी वैद्यकीय सुविधेच्या इमारती, नागरिकांत त्रिसूत्रीबद्दल आणखी जागरूकता आणि स्वयंशिस्त, तसेच लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमुळे पुढील लाटेत औरंगाबाद शहर, नागरिक सुरक्षित राहतील.
-आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त

शहराचा रिकव्हरी रेट-९४.५२ टक्के
शहरात असा घसरला आलेख
तारीख नवे रुग्ण- उपचार घेणारे रुग्ण
२६ एप्रिल- ४९७ -४९४८
२७ एप्रिल- ५९४             - ४७८३
२८ एप्रिल- ५३०             - ४७०५
२९ एप्रिल- ४५६ - ४४४९
३० एप्रिल- ४२९             -४३०९
१ मे- ४८२             - ४१७१
२ मे- ३७३             - ४०१८
३ मे- ३२०             - ३६३२
४ मे- ३७४             - ३१४६
५ मे- ३८१             - २७८५

Web Title: CoronaVirus: Decreased in corona patients; Aurangabad on its way to defeating Corona