CoronaVirus in Aurangabad : ग्रामीण भागात रेड अलर्ट; आठवडाभरात कोरोना शिरला ५९ नव्या गावांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:27 IST2021-05-06T12:25:29+5:302021-05-06T12:27:29+5:30
CoronaVirus in Aurangabad : कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.

CoronaVirus in Aurangabad : ग्रामीण भागात रेड अलर्ट; आठवडाभरात कोरोना शिरला ५९ नव्या गावांत
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढतच आहे. गेल्या आठवडाभरात ५९ नव्या गावांत कोरोना विषाणूचे संक्रमण शिरले आहे. २५ एप्रिलला सक्रिय रुग्ण ६३३ गावांत होते. त्यात २ मेपर्यंत ६२ गावांची भर पडून आता ६९५ गावांतील सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २८ दिवसांपासून रुग्ण न आढळलेल्या म्हणजेच कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांची संख्या १३३ वरून ११ ने घटून १२२ झाली.
कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे. त्यात कोरोनाची चाचणी गेल्या आठवड्याच्या शेवटी घटलेली पहायला मिळाल्याने बाधितांचा आकडा पाचशेच्या आत दिसून आला. मात्र, नव्या गावांत आणि कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव हे चिंताजनक असून आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेनेही त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागातील मृत्यूचा दर वाढलेला आहे. तसेच गंभीर रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल होत असल्याचेही निरीक्षण घाटीच्या तज्ज्ञांनी नोंदवल्याने कोरोना रुग्णांचा शोध व ट्रेसिंग वाढवण्यावर भर तसेच ग्राम दक्षता समित्यांकडून तपासणीला आणखी सहकार्य अपेक्षित आहे.
४२ गावांत १०० पेक्षा अधिक रुग्ण
जिल्ह्यात १३६८ गावांपैकी ११५३ गावांत कोरोनाचा शिरकाव आतापर्यंत झाला, तर २ मे रोजी ६९५ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. ४७६ गावांत २५ पेक्षा कमी, १२१ गावांत २५ ते ५० दरम्यान रुग्ण आहेत, तर ५० ते १०० दरम्यान ५६ तर १०० पेक्षा अधिक ४२ गावांत रुग्ण आहेत.
२ मेची स्थिती
तालुका -बाधित गावांची संख्या
औरंगाबाद -९६
फुलंब्री -४५
गंगापूर -१०२
कन्नड -१०२
खुलताबाद -२३
पैठण -११०
सिल्लोड -७७
सोयगाव -१०४