Corona Virus In Aurangabad : पैठणची शालिवाहन शक शुभारंभाची ऐतिहासिक शोभायात्रा रद्द; केवळ तीर्थखांबावर गुढी उभारून पाडवा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:05 IST2020-03-25T17:02:25+5:302020-03-25T17:05:52+5:30
पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली, आज यास तीर्थखांब म्हणून ओलखले जाते.

Corona Virus In Aurangabad : पैठणची शालिवाहन शक शुभारंभाची ऐतिहासिक शोभायात्रा रद्द; केवळ तीर्थखांबावर गुढी उभारून पाडवा साजरा
पैठण : शक कर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दिचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पैठण येथे मराठी नववर्षाचा जनक व पैठण भूमिपुत्र असलेल्या शालिवाहन राजाच्या प्रतिमेसह शालिवाहन शक शुभारंभ शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रा रद्द करून ऐतिहासिक तीर्थखांबावर गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली.
पैठणच्या सातवाहन घराण्याने देशावर ई स पूर्व २३० ते २३० असे ४५० वर्षाहून अधिक काळ राज्य केले, त्यांच्या साम्राज्याची राजधानी पैठण नगरी होती. सातवाहन सम्राट पुलुमावी याने उज्जैनच्या विक्रमादित्याच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजयाचे स्मरण रहावे म्हणून मराठी कालगनणेस चैत्र शुध्द प्रतिपदेस प्रारंभ केला. पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली, आज यास तीर्थखांब म्हणून ओलखले जाते. मराठी नववर्षाच्या या दिनाशी शालिवाहनांचा वैभवशाली ईतिहास जोडलेला असल्याने पैठण नगरीस आजच्या दिनाचे महत्व काही औरच असते. मात्र, कोरोनाचे संकट समोर असल्याने आजचा उत्सव रद्द करून पैठण करांनी परंपरा खंडीत होऊ नये म्हणून तीर्थखांबावर एका नागरिकाने जाऊन गुढी उभारली.
पैठण येथे ८ एप्रिल १९७८च्या वर्षप्रतिपदेला शालिवाहन समारोह साजरा करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी आर भोसले आणि ईतिहास विभागाचे प्रमुख डॉ पंढरीनाथ राणडे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. ईतिहास संशोधक व संग्राहक कै बाळासाहेब पाटिल यांनी शालिवाहन शक वर्षारंभ दिनी समारोह साजरा करण्याची परंपरा चालू ठेवली. त्यांच्या नंतर ईतिहास प्रेमी नागरिकांनी शालिवाहन काळाचे स्मरण व चिंतन व्हावे या हेतूने ही परंपरा जोपासली.
शालिवाहन ( सातवाहन ) कालीन ईतिहासाचे नवीन दृष्टिकोणातून आकलन करणे गरजेचे
सातवाहन साम्राज्या खाली संपूर्ण दक्षिण भारतीय द्विपकल्प येत असे, सातवाहनाची वाहने हत्ती घोडे त्रिसमुद्राचे पाणी पीत असत असे म्हटल्या जात होते या वरून ' त्रिसमुद्रतोय पितवावन ' अशी उपाधी शालिवाहन राजास दिली गेली होती सातवाहनाच्या साम्राज्याचा पाऊल खुणा आजही त्याची राजधानी असलेल्या पैठण नगरीत अस्तित्वात आहे या वैभवशाली ईतिहासाचे नव्या दृष्टीकोणातून आकलन करण्याची आता गरज असल्याचे जाणवत आहे यात सातवाहन कालीन लोकसाहित्य आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून या साहित्याचे ऐतिहासिक आकलन करणे गरजेचे आहे तसेच सातवाहन कालीन शिलालेखांचे संकलन करून तत्कालीन समाज व संस्कृति वर प्रकाश टाकावा लागणार आहे सातवाहनकालिन बौध्द लेणी महाराष्ट्र भर असून या लेणीसमूहातून प्रकट होणाऱ्या कला, साहित्य व संस्कृतिचे अध्यपन अद्याप झालेले नाही, यातून सातवाहन कालीन लोकसंस्कृतीसह सामाजिक आर्थिक पैलूचे नव्याने आकलन होऊ शकते. असे, ईतिहासकारांचे मत आहे.
शालीवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला; त्यामुळे शककर्ता शालिवाहन अशी उपाधी दिली जाते शालिवाहनाच्या काळात भूगोल खगोल ज्योतिष पंचांग गणित ई. विषय प्रगतीपथावर होते. त्याच प्रमाणे शिक्के, मणी, आभुषणे, भांडी, पैठणी वस्त्र, नाणी, व स्थापत्यकला साहित्य आदिची भरभराट झाली होती. शिवाय, वैदिक धर्म, बौध्दधर्म व जैनधर्म आदी गुण्या गोविंदाने नांदत असत.