महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅश’ विद्यापीठात, संस्थाचालकांच्या जाचातून प्राध्यापकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:23 IST2025-06-12T12:22:16+5:302025-06-12T12:23:23+5:30
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा, प्रशासनात बदल करण्याचा सपाटाच लावला आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅश’ विद्यापीठात, संस्थाचालकांच्या जाचातून प्राध्यापकांची सुटका
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी ‘करिअर ॲडव्हान्स स्किम’ (कॅश) राबविण्यात येते. त्यात मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचा वेगवेगळ्या घटकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ प्रशासन प्राध्यापकांचे ‘कॅश’ थेट विद्यापीठात आयोजित करणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा, प्रशासनात बदल करण्याचा सपाटाच लावला आहे. त्याच वेळी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या गैरप्रकारांवर प्रहार करण्यात येत आहे. पदव्युत्तर महाविद्यालयातील गुणवत्ता तपासण्यासाठी बाहेरील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समित्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ प्रवेशापुरते पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्याच वेळी नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात परीक्षांमध्ये सुधारणा करणारे निर्णय घेतले आहेत.
महाविद्यालय आणि विद्यापीठातील तासिकांकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांच्या ७५ टक्के उपस्थितीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्याच वेळी प्राध्यापकांच्या जिव्हाळ्याच्या ‘कॅश’मध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक प्राध्यापकांना ‘कॅश’साठी संस्थाचालकांचा त्रास सहन करावा लागतो. यातून मुक्तता मिळण्यासाठी विद्यापीठ पातळीवर ‘कॅश’ करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी संस्थाचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत तरी कोरम पूर्ण होत असेल तर संबंधित प्राध्यापकांना नियमानुसार पदोन्नती मिळेल. ज्या प्राध्यापकांचे ‘कॅश’ प्रस्ताव पाठविण्यात येणार नाहीत, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यावर जबाबदारी निश्चिती करीत नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही विद्यापीठ प्रशासनाने दिली.
सर्वांच्या सहकार्यांची गरज
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील परीक्षा पद्धती, गुणवत्ता राखण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यापीठ प्रशासन निर्णय घेत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून सहकार्य केले पाहिजे.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू