छत्रपती संभाजीनगर मनपात प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला ५० लाखांचा निधी, एका प्रभागात २ कोटी
By मुजीब देवणीकर | Updated: January 24, 2026 19:28 IST2026-01-24T19:22:18+5:302026-01-24T19:28:28+5:30
११५ नगरसेवकांसाठी ५७ कोटी ५० लाखांची मनपा करणार तरतूद

छत्रपती संभाजीनगर मनपात प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला ५० लाखांचा निधी, एका प्रभागात २ कोटी
छत्रपती संभाजीनगर : शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. प्रभागांतर्गत हद्द नाही. विकास कामे कशी करावी?, असा प्रश्न नवनिर्वाचित नगरसेवकांना पडला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाला १ वर्षासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा विचार सुरू केला आहे. एका प्रभागाला २ कोटी रुपयांची रक्कम अंदाजपत्रकात ठरवून दिली जाईल. ११५ नगरसेवकांसाठी ५७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात राहणार असल्याची माहिती मनपातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
महापालिकेत ७० टक्के नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. ३० टक्के नगरसेवकांनी दोन ते तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. माजी नगरसेवकांना कामकाजाचा चांगला दांडगा अनुभव आहे. अनुभवी नगरसेवक मोठ्या प्रमाणात निधी आपल्या वॉर्डात ओढून नेत असत. त्यामुळे अन्य नगरसेवकांना विकास कामांसाठी फारसा निधी मिळत नव्हता. विरोधी बाकावर बसणाऱ्या नागरसेवकांचे तर चांगलेच हाल होत असत. प्रभाग पद्धतीत निवडून आलेल्या नगरसेवकांना निधी किती मिळेल, कशा पद्धतीने खर्च करायचा, प्रभागातील चार नगरसेवकांचे काय? असे अनेक प्रश्न पडू लागले. प्रभागातील नगरसेवकांमध्ये वाद होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने रामबाण उपाय शोधून काढला. प्रत्येक नगरसेवकाला ५० लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळेल. ज्यांच्या निधीतून विकास काम होत आहे, तेच नगरसेवक त्याचे ‘श्रेय’ घेऊ शकतील. प्रभागातील कोणत्याही कोपऱ्यात जावून ते निधी खर्च करू शकतात. एका प्रभागाला २ कोटी रुपये निधी दिला जाईल. एवढा निधी प्रत्येक प्रभागासाठी पुरेल, अशी प्रशासनाचीही अपेक्षा आहे.
धोरणात्मक निर्णय नंतर
पुढील महिन्यात महापौर निवडणूक होईल. त्यानंतर स्थायी समिती सभापतींची निवड होईल. धाेरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या दोन्ही पदाधिकाऱ्यांना आहे. दोन्ही पदाधिकारी यात फेरबदल करू शकतात. पदाधिकाऱ्यांना वाटले की, प्रत्येक नगरसेवकाला यापेक्षा अधिक निधी वाढवून हवा, तर ते धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
आर्थिक अवस्था नाजूक
महापालिकेवर १६०० कोटींचे कर्ज आहे. भविष्यात दरमहा खर्चही बराच वाढेल. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविणे खूपच कठीण जाईल. मुख्य रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे हे चार प्रश्न प्रशासनाने अगोदर सोडविले. इतर छोटी-मोठी कामे नगरसेवकांना करावी लागतील.