वादळी वाऱ्याचा छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना तडाखा; पपई, केळी आडवी, पत्रे उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:35 IST2025-06-13T14:33:29+5:302025-06-13T14:35:37+5:30
सोयगाव, कन्नड, पैठण तालुक्यात मोठे नुकसान

वादळी वाऱ्याचा छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना तडाखा; पपई, केळी आडवी, पत्रे उडाली
सोयगाव, पैठण, नागद: वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सोयगाव, कन्नड व पैठण तालुक्यातील केळी, पपईची झाडे आडवी पडली असून विजेचे खांब पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठे नुकसान झाले आहे.
सोयगाव, बनोटी व जरंडी या तीन महसूल मंडळात बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आमखेड्यात विजेचे पोल कोसळले. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. वादळी वाऱ्याने शिंदोल शिवारातील शेतकरी रवींद्र सोनवणे यांच्या शेतातील काढणीवर आलेली केळीची ६०० झाडे आडवी झाली. त्यामुळे त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर ईश्वर पाटील व बापू बिरारे यांच्या शेतातील केळीची प्रत्येकी ३०० झाडे आडवी पडली. बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी वडगाव सज्जाचे तलाठी संतोष राऊत यांना दूरध्वनीवरून नुकसानीची माहिती दिली असता त्यांनी मी रजेवर आहे, तुम्हीच तुमचे नुकसानीचे फोटो काढून तहसीलला द्या, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
पाचोऱ्यात पंचनामे अन् सोयगावात दुर्लक्ष
बुधवारी रात्री सोयगाव तालुक्यासह बाजूच्या पाचोरा तालुक्यातही नुकसान झाले. त्यानंतर गुरुवारी पाचोऱ्यात महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले; मात्र सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गाव शिवारात महसूलचा एकही कर्मचारी फिरकला नाही. याबाबत गुरुवारी दुपारी ३ वाजता तहसीलदार मनीषा मेने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पैठण तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू
पैठण : शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने लोहगाव, तोंडोळी, मुलांनी वाडगाव या परिसरातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी केळीची झाडे मोडून पडली. तसेच डाळिंबाच्या झाडांचीही मोठी फळगळती झाली. झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून गुरूवारपासून पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली.
सरासरी २२ मिमी पाऊस
पैठण तालुक्यातील सर्व दहाही महसूल मंडळात बुधवारी सायंकाळी व रात्री पाऊस झाला. यात पैठण मंडळात १९ मिमी, पिंपळवाडी, बिडकीन, बालानगर मंडळात प्रत्येकी १४ मिमी, ढोरकीण १७, नांदर २६, आडुळ ३१, पाचोड ३५, लोहगाव २४, विहामांडवा ३३ मिमी असे सरासरी २२.७ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला.
करंजखेड येथे घरावरील पत्रे उडाले; दोघे जखमी
करंजखेड : कन्नड तालुक्यातील करंजखेड व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात करजखेडजवळील गोकुळवाडी येथील भगवान कडुबा देठे, दीपक रोहिदास गायकवाड, दामाजी गायकवाड, रामभाऊ ठेपले, राहुल लंगडे व वळवळे वस्ती येथील सुभाष वळवळे, आप्पा वळवळे यांच्या घरांवरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. यात सुभाष वळवळे व आप्पा वळवळे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. वादळात अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या, तर विद्युत पोल वाकले, ताराही तुटल्या. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. करंजखेड येथील अनिल पवार यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले.
घरांवरील पत्रे उडाले; एक जण जखमी
पाचोड: पैठण तालुक्यातील पाचोड, टाकळी अंबड, दावरवाडी, विहामांडवा, बालानगर, जायकवाडी परिसर, ढोरकिन, रांजणगाव खुरी परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी महंमदपूर येथील बाबुराव वाणी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यानंतर लिंबाचे झाड त्यांच्या घरावर कोसळल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. नाटकरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर बाभळीचे झाड पडल्यामुळे कांदा चाळीचे नुकसान झाले. तर विहामांडवा येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब भंडारी, चांगतपुरी येथील किरण हरकचंद चोरमले, चंद्रकांत हरकचंद चोरमले, लोहगाव येथील ईसाक हबीब पठाण यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे नायब तहसीलदार प्रभाकर घुगे, राहुल बनसोडे यांच्या पथकाने केले असून याबाबतचा अहवाल उपविभागीय महसूल अधिकारी नीलम बाफना यांनी वरिष्ठांना पाठविला आहे.
सिल्लोड तालुक्यात रिमझिम पाऊस
सिल्लोड : तालुक्यात गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही भागात रिमझिम पाऊस झाला. शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. निल्लोड परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. यावेळी विद्युत रोहित्राची एक तार तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.