'बाटू' विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळेंचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा
By राम शिनगारे | Updated: March 25, 2026 14:55 IST2026-03-25T14:51:04+5:302026-03-25T14:55:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पुन्हा प्रशासकीय भूकंप, तिसऱ्या कुलगुरूंचा पदत्याग

'बाटू' विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळेंचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा
छत्रपती संभाजीनगर : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी पदाचा राजीनामा कुलपती तथा राज्यपालांकडे सुपूर्द केल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्यास तंत्र शिक्षणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील संशोधक डॉ. कारभारी काळे यांची ३१ डिसेंबर २०२१ रोजी ‘बाटू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. त्यांना पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ मिळणार होता. मात्र, हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डॉ. काळे यांनी राजीनामा दिला आहे. कुलपती डॉ. काळे यांचा राजीनामा स्वीकारतात की नाही याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. डॉ. काळे यांच्या राजीनाम्याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
गैरव्यवस्थापनामुळे विद्यापीठ चर्चेत
‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील परीक्षांच्या निकालांसह इतर गैरव्यवस्थापनामुळे विद्यापीठ चर्चेत आलेले आहे. अनेक महाविद्यालयांनी पुन्हा जुन्या विद्यापीठाचे संलग्नता घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणीही राज्य शासनाकडे वारंवार होत आहे. त्यातच विद्यापीठ चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाचा संपूर्ण खोळंबा झालेला असल्याचेही विविध चौकशांमधून स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ. काळे यांचाही राजीनामा राज्य शासनाच्या असहकार्याच्या भूमिकेमुळेच झाला आहे का, अशी चर्चा आहे.
तिसऱ्या कुलगुरूंचा राजीनामा
‘बाटू’ विद्यापीठात पायाभूत सुविधांसह मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच राज्य शासनाचेही दुर्लक्ष असल्यामुळे विविध कुलगुरूंना कामकाज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘बाटू’चे तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचा राजीनामा कुलपतींनी फेटाळला होता. त्यानंतर नियुक्त कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनीही फेब्रुवारी २०२१ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती केली. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. काळे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनीही मुदतपूर्व राजीनामा दिला.