‘त्या’ प्रकरणातील बँक व्यवस्थापक गजाआड
By Admin | Updated: May 21, 2014 00:49 IST2014-05-21T00:46:09+5:302014-05-21T00:49:39+5:30
जिंतूर : पालिकेतील २३ लाख रुपयांच्या धनादेश हेराफेरी प्रकरणातील अॅक्सेस बँकेचा व्यवस्थापक योगेश सोनवणे यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने नाशिक येथून अटक केली़

‘त्या’ प्रकरणातील बँक व्यवस्थापक गजाआड
जिंतूर : पालिकेतील २३ लाख रुपयांच्या धनादेश हेराफेरी प्रकरणातील अॅक्सेस बँकेचा व्यवस्थापक योगेश सोनवणे यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने नाशिक येथून अटक केली़ त्यास २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असल्याने प्रकरणाचा गुंता त्यास अटक केल्यानंतरच उलगडेल़ जिंतूर नगरपालिकेतून २३ लाख रुपयांचा धनादेश आॅगस्ट महिन्यामध्ये गहाळ झाला होता़ त्यानंतर पालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता़ परंतु, प्रकरणामध्ये अॅक्सेस बँकेचा निश्चित सहभाग असावा, असा कयास सर्वसामान्यांसह पोलिस यंत्रणेलाही होता़ त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला प्रारंभ केला होता़ पोलिसांनी अॅक्सेस बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश सोनवणे, बँक अधिकारी डे, अलिउद्दीन आदींची चौकशी केली़ पोलिसांचा ससेमिरा मागे लागत असल्याचे दिसताच या तिघांनीही अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न केले़ परंतु, सोनवणे व अलीउद्दीन यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर हे दोघे फरार होते़ पोलिसांना बँक व्यवस्थाप सोनवणे हा नाशिक येथे असल्याचा सुगावा लागल्याने १२ मे रोजी त्यास अटक करण्यात आली़ न्यायालयासमोर उभे केले असता त्यास १६ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली़ परंतु, तपासाचे बारकावे विविध दस्ताऐवज व इतर आरोपी फरार असल्याने पोलिस कोठडी वाढून मागण्यात आली़ प्रथम त्यास १८ मे पर्यंत व त्यानंतर २१ मेपर्यंत सोनवणे यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली़ तर डे यांना अंतरिम जामीन असल्याने त्यांना पोलिस अद्याप अटक करू शकली नाही़ परंतु, प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अलीयोद्दीन अद्यापही फरार आहे़ (वार्ताहर) सदरील प्रकरणात मुख्य सूत्रधार हा अलीउद्दीन हाच आहे़ यास अटक केल्यानंतरच प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळणार आहे़, नव्हे तर अलीउद्दीन हाच प्रकरणाचा कर्ताधर्ता असावा, यापर्यंत पोलिस यंत्रणा पोहचली आहे़ त्यामुळे अलीउद्दीन यास अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे़ सदरील प्रकरणात जिंतूर पालिकेच्या तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले होते़ परंतु, बँकेने २३ लाखांच्या धनादेश गहाळ प्रकरणी संपूर्ण रक्कम पालिकेला वर्ग केली आहे़ त्यामुळे आता या कर्मचार्यांचे निलंबन मागे घेणे गरजेचे आहे़ प्रशासकीय कारवाई म्हणून त्यांनी केलेल्या अनियमीततेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईत आता शिथिलता देणे गरजेचे आहे़