Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची आठ दिवसांपूर्वी पडली ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:42 IST2018-05-13T01:23:55+5:302018-05-14T10:42:09+5:30
शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची आठ दिवसांपूर्वी पडली ठिणगी
औरंगाबाद : शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
शहागंज चमनच्या चारही बाजूने अतिक्रमणे अनेक वर्षांपासून आहेत. येथे हातगाड्या लावणाºयांचे साहित्य फेकून देणे, त्यांना मारहाण करण्याचे काम शिवसेनेच्या लच्छू पहेलवान यांनी केले. प्रतिउत्तरात एमआयएमने कडाडून विरोध दर्शवित सिटीचौैक पोलीस ठाण्यात पहेलवान यांच्यावर कारवाई करावी म्हणून ठिय्या आंदोलनही केले. शहागंज चमनमधील टपºया उठविण्याची मागणी लच्छू पहेलवान यांनी केली. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक तेथे पोहोचल्यावर विरोधी पक्षनेता फिरोज खान, नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेने अनधिकृत नळ कापण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी महापालिकेने वादग्रस्त मोतीकारंजा या परिसराची निवड केली. येथील मेन लाईनवरील ४० नळ कापण्यात आले. शुक्रवारी रात्री दहा नळ कनेक्शन कापले. एका मंदिराचे नळ कापण्याच्या मुद्यावरून रात्री ९ वाजता वाद उकरून काढण्यात आला. दोन गट आमने सामने आले. पाहता पाहता जाळपोळ सुरू झाली. यानंतर रात्री उशिरा शिवसेना आणि एमआयएम समोरासमोर आले. रात्री बारा वाजता तर शहागंज, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज चमन, गुलमंडी आदी भागात जाळपोळ, दगफडेक सत्र सुरू झाले.
पोलीस यंत्रणा अपयशी
शहागंज येथील अतिक्रमणावरून दोन गटांत वारंवार तेढ निर्माण होत असतानाही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. या ठिणगीचा कोणत्याही क्षणी भडका होऊ शकतो, याची जाणीव पोलिसांना नव्हती का? पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेलाही याचा थांगपत्ता लागू नये म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल.