औरादचे जलकुंभ धोक्यात !
By Admin | Updated: May 24, 2014 01:36 IST2014-05-24T01:26:24+5:302014-05-24T01:36:40+5:30
बालाजी थेटे, औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील ३० हजार लोकसंख्या असलेल्या औराद शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कुचकामी झाली
औरादचे जलकुंभ धोक्यात !
बालाजी थेटे, औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील ३० हजार लोकसंख्या असलेल्या औराद शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कुचकामी झाली असून, १९८० साली बांधलेला जलकुंभ त्यावेळी ५ हजार लोकसंख्या गृहित धरून बांधला होता. याची दुरवस्था झाली असून, या जलकुंभाला अनेक तडे गेले आहेत. निकामी झाले तरी याचा वापर केला जात आहे. तेरणा-मांजरा नदीच्या संगमावर वसलेल्या औराद गावाला तिन्ही बाजूने पाणीसाठा आहे. पण निम्म्या गावात अद्याप नळयोजना काय असते, याचा गंधच नाही, अशी अवस्था आहे. १९८० साली ५ हजार लोकसंख्या ग्राह्य धरून जलकुंभ बांधण्यात आला. हा जलकुंभ आजघडीला पडण्याच्या स्थितीत आहे. याला तडे गेले आहेत. जीण्याच्या पायर्या पडल्या आहेत. तरीपण इतर पर्यायी पाणीसाठा करण्यासाठी दुसरा पर्याय नाही म्हणून या टाकीचा वापर केला जात आहे. प्रशासनाने याची पाहणी करून इतर पर्यायी जलकुंभ बांधून ही टाकी पाडावी, असे म्हटले जात आहे. अद्याप याचा पर्याय उभा राहू शकला नाही. औराद शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन औराद ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत सहभाग घेतला आहे. यात नवीन जलकुंभ, नवीन पाईपलाईन व इतर साहित्यासाठी ८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याचा सर्वेही झाला आहे. पुढील मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण अद्याप राज्य शासनाकडून मंजुरी येणे बाकी आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी टी.डी. बिरादार यांनी दिली. याविषयी उपसरपंच डॉ. मल्लिकार्जुन शंकद म्हणाले की, टाकीची क्षमता कमी आहे. पण पाणी साठविण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे या टाकीचाच पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात आहे. औराद गावाचा विस्तार वाढला, पण या वाढीव गणेश नगर, शास्त्री नगर, बसस्थानक परिसर, सैफ अली नगर, शिवाजी चौकासह आदी नवीन वाढीव शहरात नळयोजना अद्याप पोहोचलीच नाही. काही भागात मिनी वॉटर सप्लाय योजना आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या भागातील नागरिकांनी स्वखर्चातून खाजगी विंधन विहीर मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या तिन्ही बाजूंनी जलसाठे उपलब्ध आहेत. तरीही गावातील काही भागांत अजूनही जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. १९८० साली बांधण्यात आलेल्या या जलकुंभाला तडे गेल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीची मागणी होत आहे.