साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डीलिट प्रदान, सन्मानाने कुटुंबिय भावनिक
By योगेश पायघन | Updated: November 27, 2022 20:24 IST2022-11-27T20:24:35+5:302022-11-27T20:24:56+5:30
एमजीएम दीक्षांत सोहळा, ५३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; ९ विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडलने सत्कार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डीलिट प्रदान, सन्मानाने कुटुंबिय भावनिक
औरंगाबाद: एमजीएम विद्यापीठाकडून पहिल्या दीक्षांत सोहळ्यात पहिली मानद वाड:मय पंडीत पदवी (डी.लिट) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आली. कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते या सन्मानाच्या डी.लीट पदवीचा स्विकार करतांना त्यांच्या स्नुषा सावित्री मधुकर साठे यांना आनंदाश्रु अनावर झाले होते. यावेळी एमजीएम विद्यापीठातून उत्तीर्ण ५३४ विद्यार्थ्यांनाही या वेळी पदवी प्रदान करण्यात आली.
खच्चुन भरलेले रूख्मिनी सभागृहात उपस्थितांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात या अण्णाभाऊंच्या केलेल्या सन्मानाबद्दल आदर व्यक्त केला. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या शिस्तबद्ध व दिमाखदार सोहळ्यास एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, डॉ. नितीन कदम, डॉ. सुधीर कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, रणजीत कक्कड, भाऊसाहेब राजळे, डॉ. शशांक दळवी, डॉ. एच.एच.शिंदे, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ. विजया देशमुख, डॉ. रेखा शेळके, पार्वती दत्ता, डॉ. विजया मुसांडे, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावित्री मधुकर साठे म्हणाल्या. ‘आज मला खूप आनंद झालाय, जी पदवी अण्णाभाऊंच्या हातात द्यायला पाहिजी. ती पदवी अण्णाभाऊंच्या सुनबाईच्या हातात देताय. आजचा दिवस आणि मी त्यांची सुन म्हणून खुप भाग्याची हाय. एमजीएम विद्यापीठाने केलेल्या गौरवाबद्दल मनापासुन आभार’. एमजीएम विद्यापीठाने ही भूमिका घेणे समता आणि बंधुत्वाची आहे. अण्णाभाऊ साठेंच्या गुणवत्तेला आतापर्यंत मिळालेला नकाराला ही चपराक आहे.आजपर्यंत जात पाहून अण्णाभाऊंच्या सन्मानाला नाकारण्यांना एमजीएम विद्यापीठाची समता आणि बंधुत्वाची ही चपराक असल्याचे त्यांचे नातू सचिन साठे म्हणाले.
या सन्मानामुळे येणाऱ्या काळात त्यांना भारतरत्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून साठे कुटुंबिय आणि समाजबांधवांकडून आभार मानले. अध्यक्षीय समारोप कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. वैष्णवी जोशी, नितीन गोरे, पी.अॅन्सी ग्रॅन्ना पी, अमिता चौहाण, कोमल ओझा, शिवानी शेटे, शुभांगी पाटील, मोहम्मद कैफ रफिक अहमद देशमुख, सौमय्या मकराणी या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडल देवून सत्कार करण्यात आला. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन कुलसचिव डाॅ. आशिष गाडेकर यांनी केले.
उच्च शिक्षणात मानवी मुल्यांचीही जपणूक व्हावी : काकोडकर
प्रत्येक अध्ययनार्थींना तंत्रज्ञानात्मक शिक्षणापर्यंत पोहोचवणे, व्यवसायिकांची निर्मिती करून आसपासाची इकॉलॉजी आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी योगदान देणे, तळागाळातील लोकांच्या क्षमतांचे सक्षमीकरण करतांना मानवी मुल्यांचीही जपणूक झाली पाहिजे. संशोधन प्रकाशनात देश तिसऱ्या असून त्यात गुणवत्ता आणि संख्यात्मक वाढीचा प्रयत्न व्हावा. स्टॅनफोर्ड विद्यापीठाप्रमाणे आर्थीक हातभार लावणारी इकोसिस्टम विद्यापीठातून तयार व्हावी, ग्रामीण-शहरी दरी कमी व्हायला हवी. असे शास्ज्ञज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी दीक्षांत भाषणात म्हणाले.