"हे घ्या पुरावे!"; कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा भ्रष्टाचार, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:05 IST2026-03-09T16:05:08+5:302026-03-09T16:05:08+5:30
'बोगस बँक गॅरंटी'तून सरकारला चुना; कृषी वाहिनी घोटाळ्यात नेत्यांचा सहभाग, दानवे आक्रमक

"हे घ्या पुरावे!"; कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा भ्रष्टाचार, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारच्या कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. "भाजपने पुरावे मागितले होते, ते आज मी जाहीर करत आहे," असे म्हणत दानवे यांनी या प्रकरणातील बोगस बँक गॅरंटी आणि प्रशासकीय अनागोंदीवर बोट ठेवले.
बोगस बँक गॅरंटीतून सरकारची फसवणूक
दानवे यांनी सांगितले की, या योजनेत सहभागी कंपन्यांनी बोगस बँक गॅरंटी सादर केली होती, ज्याची माहिती असूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. "टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असतानाही काम सुरू झाले नाही. उलट, बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी स्वतःच्या नावावर करून फायनान्स उचलण्यात आला," असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी राहुल पन्हाळे या अधिकाऱ्यासह इतरांवर तक्रारी असून आतापर्यंत चार अधिकारी निलंबित झाले आहेत. नांदेडमध्ये सुमारे तीन हजार एकर जमीन 'मेघा इंजिनियरिंग' कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय शिरसाट प्रकरण
अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपात तथ्य वाटते. शिरसाट यांच्या खात्यातील अनियमिततेमुळेच मुख्यमंत्री त्यांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सत्तेत असूनही शिंदे गटाला हातगाडी प्रश्नावर आंदोलन करावे लागते, याचा अर्थ प्रशासन त्यांचे ऐकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली. अजित पवार यांचा विमान अपघात हा केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता तपासली पाहिजे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.