कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:14 IST2025-05-31T17:13:37+5:302025-05-31T17:14:47+5:30
‘अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असे वादग्रस्त विधान केल्यानंतर आणखी एका वादग्रस्त विधानाची भर

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
छत्रपती संभाजीनगर : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि अजितदादांनी मला हे खाते दिले आहे’, असे विधान त्यांनी शुक्रवारी येथे दोन कार्यक्रमांत केले. कोकाटे यांच्या या विधानाची विद्यार्थी आणि शेतकऱ्यांत मोठी चर्चा झाली.
कोकाटे यांनी बुधवारी नाशिकमध्ये सिन्नरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना ‘अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर राज्यभरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांचे नवीन विधान समोर आले आहे. कृषी विभागाच्यावतीने आयोजित प्रगतिशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आणि शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार या दोन्ही समारंभात त्यांनी हे विधान केले. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मला हे कृषिखाते मुद्दाम दिले असून, त्यांचे या खात्याकडे विशेष लक्ष आहे, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याचीही त्यांची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
कोकाटे यांची यापूर्वीची विधाने
१. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता.
२. आता भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो.
३. स्वीय सहायकांच्या बदल्यांचे अधिकारसुद्धा कृषिमंत्र्यांना नाहीत.