छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षांपूर्वी टेकऑफ घेताच कोसळले होते विमान, कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या : अपघातात ५५ जणांचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:53 IST2025-06-13T09:53:08+5:302025-06-13T09:53:28+5:30
Plane Crash In Chhatrapati Sambhajinagar: अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षांपूर्वी टेकऑफ घेताच कोसळले होते विमान, कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या : अपघातात ५५ जणांचा झाला होता मृत्यू
छत्रपती संभाजीनगर - अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.
इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली-जयपूर-उदयपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले होते. मात्र, उड्डाणासाठी आवश्यक उंची विमानाला गाठता आली नाही. त्यामुळे धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड महामार्गावरील उभ्या उंच ट्रकला विमानाचे मागील चाक चाटून गेले. विमानाचे उड्डाण पाहण्यासाठी चालकाने तेथे हा ट्रक उभा केला होता. त्यात कापसाच्या गाठी होत्या. ट्रकला चाटून गेल्यानंतर विमानाचे मागील एक चाक निखळून पडले. पुढे चिकलठाणा परिसरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर विमान आदळले व भरकटत जाऊन एका शेतात पडले. त्यानंतर त्याचे तुकडे होऊन आग लागली होती.
विमानाच्या मागील भागातील सर्व, तर समोरच्या भागातील काही प्रवासी मृत्युमुखी पडले. यातील काहीजण जळून, तर काही गुदमरून मृत्यू पावले. छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या व्हिडिओकाॅनचे नंदलाल धूत, ए. डी. जोशी, पी. यू. जैन-ठोले, हाॅटेल गुरूचे जव्हारानी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत, व्ही. ए. जाधव यांच्यासह ५५ जणांचा दुर्दैवी मृत्यू शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेला.
विमान जुने होते, रनवे छोटा होता...
या अपघातात जे काही बोटावर मोजण्या इतके प्रवासी वाचले त्यातील मी एक आहे. तो कडक उन्हाचा दिवस होता. तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सियस होते. हवा विरळ होती. विमान जुने होते, रनवे छोटा होता. मात्र, आज गुजरातमध्ये विमान अपघात झाला तेव्हा विमान टेकऑफ करुन ६२५ फूट उंचीवर पोहोचले होते. सुरुवात चांगली झाली. टेकऑफ नंतरची उंचीही समाधानकारक गाठली होती. पण नंतर इंजिनची ताकद कमी पडली असावी, तांत्रिक किंवा संगणकीय बिघाड झाला असावा. जगात दररोज १० लाख टेकऑफ व लॅंडिंग होतात पण त्यात कधी तरी एखादा अपघात होतो. त्यामुळे विमानाचा प्रवास आजही सुरक्षितच आहे. पण विमान अपघात झाल्यावर कोणीच वाचत नाही, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
- अनिल भालेराव; देवगिरी प्रांत संघचालक
विमानाचे तीन तुकडे, उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप
३२ वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेत ५३ प्रवासी आणि २ कर्मचारी अशा ५५ जणांचा बळी गेला होता. विमानाचे तीन तुकडे झाले होते. या तुकड्यांतून पटापट उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप राहिले.
विमान अपघाताचे रंगीत छायाचित्र दुसऱ्या दिवशीच्या अंकात केवळ ‘लोकमत’मध्येच प्रसिद्ध झाले होते. दुर्घटनेनंतरचे हे पहिले छायाचित्र ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी स्वत: कॅमेऱ्यात टिपले हाेते.