जिल्हाभरातील ७४ प्रकल्प कोरडे

By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-20T23:36:49+5:302014-07-21T00:23:14+5:30

उस्मानाबाद : सतत दुष्काळाच्या फेऱ्यात अडकणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातही अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे़

74 projects across the district are dry | जिल्हाभरातील ७४ प्रकल्प कोरडे

जिल्हाभरातील ७४ प्रकल्प कोरडे

उस्मानाबाद : सतत दुष्काळाच्या फेऱ्यात अडकणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातही अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे़ एक ते दीड महिन्याने बरसलेल्या पावसाने पुन्हा दडी मारली आहे़ निम्मा पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यातील तब्बल ७४ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक असून, ९४ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे़ तर इतर साठवण तलावात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ एकीकडे सोयाबीनचे बोगस बियाणे आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, भीषण दुष्काळाच्या चिंतेने जिल्हावासियांना ग्रासले आहे़
एक ते दीड महिना ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली़ या अल्पपावसावर ४० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झाल्या होत्या़ मात्र, विविध कंपन्यांनी आपल्या तुंबड्या भरण्यासाठी सोयाबिनचे बोगस बियाणे माथी मारल्याने हजारो हेक्टरवरील दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभारले आहे़ एकीकडे रूसलेला वरूणराजा अन् दुसरीकडे सोयाबिनचे बोगस बियाणे यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ पावसाने दडी मारल्याने इतर पिकांंनाही धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ एकीकडे शेतकरी हैराण झालेला असताना दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत़
तुळजापूर तालुक्यातील कुरनूर या मध्यम प्रकल्पात ७़८८० दलघमी पाणीसाठा असून, १५़१८ टक्के उपयुक्त पाणी आहे़ हरणी प्रकल्पात १़९०० दलघमी पाणीसाठा असून, ४़४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ खंडाळा प्रकल्पात १़२२६ दलघमी पाणीसाठा असून, ४़०६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ त्यामुळे तुळजापूरसह नळदुर्ग शहर, ग्रामीण भागाला साधारणत: महिना-दीड महिना हे पाणी पुरणार आहे़
उमरगा तालुक्यातील जकापूर प्रकल्पात ०़१२५ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ तुरोरी प्रकल्पातही ०़४४२ दलघमी मृतसाठा उपलब्ध आहे़ बेन्नीतुरा प्रकल्पात ११़५० टक्के म्हणजे २़६६६ दलघमी पाणीसाठा आहे़ या प्रकल्पांची स्थिती पाहता उमरगा, मुरूम शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे़ अनेक भागातील जलस्त्रोतातील पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे़
उस्मानाबादकरांनो लक्षात ठेवा...
खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची लागलेली सवय, यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे उस्मानाबादकरांवर आता पाणीबचत करण्याची वेळ आली आहे. टंचाई लक्षात घेता उस्मानाबादकरांना आता आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.
हात धुणे
नळाखाली हात धुतल्यास : १० लिटर. मग घेऊन : अर्धा लिटर
आंघोळ
बादलीमध्ये पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर. शॅवरखाली:१०० लिटर
दाढी
नळ सोडून दाढी केल्यास: १० लिटर मग घेवून : एक लिटर
ब्रश
नळ सोडून दाढी केल्यास: १० लिटर मग घेऊन : एक लिटर
कपडे
नळाखाली :११६ लिटर बादलीचा वापर केल्यास: ३६ लिटर
मोटार
पाईप वापरल्यास :१०० लिटर बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर.
शौचविधी
फ्लश केल्यास : २० लिटर. बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर
रायगव्हाण प्रकल्पही आटला
कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ तर भूम तालुक्यातील बाणगंगा प्रकल्पात १७ टक्के म्हणजे १़८१५ दलघमी पाणीसाठा आहे़ रामगंगा प्रकल्पात ०़५२० तर संगमेश्वर प्रकल्पात १़३०० दलघमी मृतसाठा आहे़ त्यामुळे या दोन्ही तालुक्यांवर टंचाईचे संकट आहे.
परंडा तालुक्यातील खासापूर प्रकल्पात केवळ ०़००५ दलघमी मृतसाठा आहे़ तर चांदणी, खंडेश्वर, साकत हे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे परंडा शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ भविष्यात दमदार पाऊस झाला तरच या भागातील ग्रामस्थांना दिलासा मिळून टंचाईच्या जोखडातून सुटका होण्यास मदत होईल.
जलसाठ्याची स्थिती
मोठा सीना कोळेगाव प्रकल्प आटण्याच्या मार्गावर आहे. १७ मध्यम प्रकल्पापैकी ४ प्रकल्प कोरडेठाक असून, ५ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे़ १९३ लघु प्रकल्पापैकी ७० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ तर ८८ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे. केवळ २९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे़
मोठ्या प्रकल्पातही अल्प साठा
परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पात एकूण ४़७७६ दलघमी पाणीसाठा आहे़ यातील उपयुक्त पाणीसाठा नाही़ लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पात प्रकल्पीय अहवालानुसार १२१़१८८ दलघमी पाणीसाठा आहे़ यात मृत २९़९६७ दलघमी तर उपयुक्त ९१़२२१ दलघमी पाणी आहे़ तर मांजरा प्रकल्पातील पाणीपातळीतही घट झाली आहे़ येथे २२४ दलघमी पाणीसाठा असून, मृत ४७़१३० तर उपयुक्त १७६़९६० दलघमी पाणीसाठा आहे़ मोठ्या प्रकल्पांची ही अवस्था पाहता अनेक शहरांसह ग्रामीण भागावरील पाणीटंचाईचे सावट गर्द झाले आहे़
४मराठवाड्यात सर्वाधिक लातूर जिल्ह्यात १८़१९ टक्के पाऊस झाला आहे़ तर औरंगाबाद जिल्ह्यात १३़४७ टक्के, जालना जिल्ह्यात १०़१२ टक्के, परभणी जिल्ह्यात ११़०५ टक्के, हिंगोली जिल्ह्यात केवळ ७़५५ टक्के, नांदेड जिल्ह्यात ८़१ टक्के, बीड जिल्ह्यात १५़८२ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात १७़०५ टक्के पाऊस झाला आहे़ मराठवाड्यात एकूण १२़४७ टक्के पाऊस झाला आहे़ हे चित्र चिंतेत टाकणारे आहे.
जिल्ह्यातील पाऊस
तालुका पाऊस
उस्मानाबाद १२५़६
तुळजापूर ११९़८
उमरगा ११२़६
लोहारा ११२़६
भूम १३६़४
कळंब १५०़३
परंडा १०५़३
वाशी १८६़६
एकूण १३२़४८
३५ टँकरद्वारे पाणी
४भूम : पावसाळ्याचा दुसरा महिना अखेरच्या टप्प्यात असला तरी भूम तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही़ तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, ७३ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आली आहेत़ तालुक्यातील ९६ गावांपैकी ४२ गावे व ११ वाड्यां तहानलेल्या आहेत़ वालवड, वाल्हा, सामनगावला टंचाईचा अधिक फटका बसत आहे़ हिवर्डा पाझर तलावातून अधिग्रहणासाठी खड्डा खोदून पाणीपुरवठा केला जात आहे़ तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली मध्यम प्रकल्पातही अल्प पाणीसाठा असून, टंचाई निवारणासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ गत आठ दिवसांपासून तालुक्यात केवळ ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे़ बोगस सोयाबीन बियाणामुळे शेतकरी हवालदिल असताना ऊस उत्पादकांसह बागायतदार शेतकरीही पाण्याअभावी हैराण आहेत़
दहा गावे तहानलेली
लोहारा : जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी लोहारा व परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे़ सध्या तालुक्यातील ४७ पैकी १० गावांची तहान भागविण्यासाठी १८ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ गतवर्षी सरासरी पाऊस झाल्याने यंदाचा उन्हाळा तालुकावासियांना अधिक तापदायक गेला नाही़ मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही़ त्यामुळे गावा-गावातील पाणीटंचाई तीव्र होत आहे़ तालुक्यातील मार्डी, वडगाव गांजा, कमलापूर, नागूर, कास्ती (बु़), करवंजी, अचलेर, हराळी, विलासपूर, पांढरी व लोहारा शहरासाठी १८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेकडे टंचाई आराखडा पाठविण्यात आला असल्याचे जि.प.चे सभापती असिफ मुल्ला, बीडीओ ए़बी़शिंदे यांनी सांगितले़
४० गावांना चटके
उमरगा : तालुक्यातील ९६ पैकी ४० गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ प्रशासनाकडून पाच गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ३५ गावांतून अधिग्रहणाचे प्रस्ताव पं.स.कडे आले आहेत़ बेळंब तांडा, चिंचोली जहाँगीर, एकोंडी (ज), एकोंडीवाडी, बोरी, नारंगवाडी, कदेर, समुद्राळ आदीसह तालुक्यातील ३१ गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ तर ३५ गावातील अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत़ कोळसूर, दयानंद नगर तांडा, हिप्परगावाडी, चिंचोली जहाँगीर या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोळसूर, तुरोरी, कोरेगाव, माकणी प्रकल्पातही अल्प पाणीसाठा असल्याने पाऊस झाला नाही तर तीव्र पाणीटंचाईचा सामना शहरवासियांसह ग्रामीण भागास करावा लागणार आहे़
१२ टक्केच साठा
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा असून, १०७ गावांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे़ तालुक्यातील १७ गावांना विहिरी, कूपनलिका अधिग्रहणासह टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले आहेत़ तुळजापूर तालुक्यातील हरणी प्रकल्पात १२ टक्के, बोरी धरणात १५ टक्के, खंडाळा प्रकल्पात ४ टक्के पाणीसाठा आहे़ तर सरासरी २५ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा तलावात उपलब्ध आहे़ तुळजापूर, नळदुर्ग शहरासह अणदूर गावास पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी प्रकल्पातही अल्प पाणीसाठा आहे़ सुरतगाव, यमगरवाडी, हगलूर, येडोळा, वडाचा तांडा, कोरेवाडी, किलज, मुर्टा, जळकोटवाडी येथे प्रत्येकी एक कूपनलिका अधिग्रहित करण्यात आली आहे़ तर १७ ग्रामपंचायतींकडून अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे़

Web Title: 74 projects across the district are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.