दिवसभरात पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: September 23, 2014 01:38 IST2014-09-23T01:21:39+5:302014-09-23T01:38:05+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात सोमवारीही नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली. दिवसभरात नऊ कार्यालयांमधून १५३ इच्छुकांनी

दिवसभरात पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात सोमवारीही नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली. दिवसभरात नऊ कार्यालयांमधून १५३ इच्छुकांनी ३२५ नामनिर्देशनपत्रे घेतली. तर पाच जणांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, कन्नड, पैठण आणि गंगापूर मतदारसंघांत हे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पैठण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांनी बैलगाडी मिरवणुकीद्वारे येऊन अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
कन्नड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मारोती राठोड यांनी पोलीस ग्राऊंडसमोरील प्रचार कार्यालयापासून रॅली काढून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी एक उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मोहम्मद किस्मतवाला कासीम यांनी आज पुन्हा अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी याआधी शनिवारीही एक अर्ज दाखल केला होता. तसेच औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शेख खाजा शेख किस्मतवाला यांनी उमेदवारी अर्ज भरला. गंगापूर मतदारसंघातून राम बाहेती यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत नऊ मतदारसंघांच्या कार्यालयातून एकूण ३२५ इच्छुकांनी ७१२ नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत एकूण पाच जणांचे सात अर्ज दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे बाबासाहेब पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. पोलीस निरीक्षक सी. पी. काकडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा निनावी फोन आला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी पवार यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीअंती प्रकरणात तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.