आणीबाणीविरुद्ध विद्रोह पुकारणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४९ जण तेव्हा कारावासात
By विकास राऊत | Updated: June 25, 2025 20:24 IST2025-06-25T20:24:20+5:302025-06-25T20:24:36+5:30
५० वर्षांपूर्वी ‘इर्मजन्सी’विरोधात विद्रोह; राज्य शासनाकडून सन्मान मानधन

आणीबाणीविरुद्ध विद्रोह पुकारणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४९ जण तेव्हा कारावासात
छत्रपती संभाजीनगर : आणीबाणीच्या काळात १९७५ ते १९७७ दरम्यान तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन, सत्याग्रह, मोर्चे काढून रस्त्यावर येणाऱ्यांना, तुरुंगवास भोगलेल्या लढवय्यांच्या संघर्षाला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. जिल्ह्यातील १४९ लढवय्यांनी आणाबाणीला कडाडून विरोध करीत ५० वर्षांपूर्वी इंदिरा सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला होता. त्या लढवय्यांना २०१८ पासून राज्य सरकारकडून सन्मान मानधन देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेंतर्गत ही मानधन योजना राबविली जाते. आणीबाणीच्या (१९७५-७७) काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले होते. याविरोधात लढा देणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगवास, नजरकैद, हालअपेष्टा भोगलेल्या व्यक्तींना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाची घेतली भेट
आणीबाणीतील लढवय्यांच्या लोकतंत्र सेनानी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांची भेट घेतली. विभागीय व जिल्हा पातळीवर आणीबाणीतील सेनानींचा सत्कार करण्याचे शासनाने सुचविले आहे. येथे २५ जून रोजी सत्कार समारंभ आयोजिला होता. परंतु मुंबईत शासकीय समारंभ होणार असल्यामुळे पुढच्या आठवड्यात हा समारंभ घेण्याचे ठरले आहे. आणीबाणीत किमान १ महिना तुरुंगवास किंवा ३ महिने नजरकैद झालेल्यांना आंदोलनाच्या पुराव्यासह अर्जाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडून झाल्यावर जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत दरमहा लाभ दिला जातो.
आणीबाणीचा काळ व कारणे अशी...
२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ (२१ महिने) आणीबाणीचा काळ होता. १९७१ मधील निवडणुकीत इंदिरा गांधी सरकार सत्तेत आले. उत्तर प्रदेशमधील राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या निवडणुकीला कोर्टात आव्हान दिले. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरविली. त्यानंतर पंतप्रधानपदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, जयप्रकाश नारायण यांचे 'संपूर्ण क्रांती' आंदोलन जोर धरत होते. अनेक ठिकाणी सरकारविरोधी निदर्शने सुरू होती. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून अनुच्छेद ३५२ अनुसार ‘अंतर्गत अस्थिरता’ या कारणास्तव आणीबाणी जाहीर केली. यात अनेक मूलभूत अधिकारांवर गदा आली. विरोधकांची धरपकड करण्यात आली. देशभरात १ लाखाहून अधिक लोकांना तुरुंगात डांबले गेले होते.
हर्सूल तुरुंगात दीड महिना डांबले
केंद्र सरकारने मूलभूत अधिकारांसह संघावर बंदी आणण्यासाठी पाऊल उचलले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कारवाई केली. हर्सूल तुरुंगात दीड महिना होतो. अनेक आठवणी आहेत. तारुण्याच्या काळात असलेली राष्ट्रप्रेमाची ऊर्जा आजही कायम आहे.
- भालचंद्र कुलकर्णी, आणीबाणीतील सेनानी
पुण्यात सत्याग्रह केला
आणीबाणीच्या विरोधात पुण्यातील शिरूर भागात सत्याग्रह केला. महाविद्यालयीन काळ होता. पोलिसांनी कारवाई करून अनेक यातना दिल्या. येरवड्याच्या तुरुंगात डांबले. २५ रोजी ५० वर्षे होत आहेत. जुने दिवस नजरेसमोर येत आहेत. २०१८ साली फडणवीस सरकारच्या काळात सेनानी सन्मान योजना आणली. ठाकरे सरकारने ती बंद केली. पुढे शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली.
- अनंत आचार्य, आणीबाणीतील सेनानी
१८ महिने नाशिकच्या तुरुंगात काढले
मला आणीबाणीच्या काळात चितेपिंपळगाव येथील शेतातून रात्री अटक केली. दोन दिवस चिकलठाणा पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर नाशिक येथील कारागृहात पाठविले. १८ महिने नाशिकच्या तुरुंगात होतो. त्यावेळी माझ्यासोबत शंभर ते दीडशे जनसंघाचे कार्यकर्ते व नेते होते.
- रामभाऊ गावंडे, माजी आमदार