Aurangabad Violence : राजाबाजार, नबाबपुऱ्यात १0 फुटांची गुलेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:12 IST2018-05-14T01:53:39+5:302018-05-14T11:12:14+5:30
नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला

Aurangabad Violence : राजाबाजार, नबाबपुऱ्यात १0 फुटांची गुलेर
औरंगाबाद : शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला. गोफणमधून गोट्यांचा मारा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दगडांचा खच, पेट्रोल-डिझेल बॉम्बसाठी वाती, मिरची पूड घटनास्थळी सापडली आहे.
जुन्या शहराला वेठीला धरणा-या जातीय दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दंगल पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होते आहे. दंगलीत पेट्रोल-डिझेल बॉम्ब, दगडगोटे मारण्यासाठी बाहुबली, पद्मावत चित्रपटात दाखविलेल्या गुलेरचा वापर करण्यात आला. रस्त्यावरील दोन खांबांना मोठे रबर बांधून, त्याच्या मध्यभागात पोतडे ठेवले होते. या पोतड््यात फेकण्यात येणारे साहित्य ठेवण्यात येत होते. या पोतड्याला पाठीमागे ताणून धरल्यानंतर त्यातील दगडगोटे, गोट्यासह इतर साहित्य दूरवर फेकले जात असल्याचे दिसून
आले.
नवाबपुरा ते राजाबाजार रस्त्यावर गोट्यांचा (मंजे) खच पडल्याचे दिसून आले. गोफणीतून या गोट्यांचा मारा केला जाता होता. अनेक दारूच्या, पेट्रोलच्या बाटल्यांमध्येही या गोट्यांचा वापर केला. अनेक गोट्या जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीच्या टेरेसवर दगडांचा खच पडलेला होता. या ठिकाणावरून दगड मारण्यात येत होते. या इमारतीमध्ये एकूण पाच कुटुंबे राहतात. खाली दंगल पेटल्याचे दिसताच कुटुंबातील महिला, मुलांना पाठीमागच्या दरवाजातून रात्री साडेआकरा वाजता बाहेर काढण्यात आले. याचवेळी या इमारतीमध्ये दंगलखोर घुसले होते. त्यांनी सर्व मजल्यांवरील दरवाजांच्या काचा, ड्रेनेजचे पाईप उद्ध्वस्त केले. याच इमारतीत मिरची पूड टाकलेली होती.
या इमारतीचा ताबाच सकाळी आठ वाजेपर्यंत दंगलखोरांकडे होता. टेरेसवर पोत्यांमधून आलेल्या दगडगोट्यांची कोणतीही कल्पना नसल्याचे इमारतीचे मालक अब्दुल समद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कुटुंबातील सदस्य जिवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यानंतर इमारतीत कोण आले, याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.