परिमल डोहणे
चंद्रपूर : कोरोना काळात जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात १७९६ कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी भरोसा सेलकडे नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील २०५ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करीत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १७९६ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २०५ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर ७१० प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. मागील वर्षी सन २०१९ मध्ये २०५२ तक्रारी दाखल झाल्या. तर जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये २८४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १९७ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.
बॉक्स
नोकरी गेली, माहेरून पैसे आण
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. यासोबत मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. तर अनेक प्रकरणात सासू-सासऱ्याचा हस्तक्षेप, पतीचे व्यसन, विवाहबाह्य संबंध, मुला-मुलींचे अफेअर आदी कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत आहे. मात्र भरोसा सेलमुळे अनेक प्रकरणात समझोता होत असल्याची समाधानकारक बाब पुढे आली आहे.
बॉक्स
७१० प्रकरणात तडजोड
सन २०२० मध्ये १७९६ तक्रारी चंद्रपूर भरोसा सेलकडे दाखल झाल्या. जुन्या प्रलंबित २५३ प्रकरणे मिळून २०४९ प्रकरणांपैकी ७१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. २०५ प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला.
बाॅक्स
२०१९ मध्ये नोंदवलेली प्रकरणे - २०५२
२०२० मध्ये नोंदवलेली प्रकरणे-१७९६
जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये नोंदवलेली प्रकरणे -२८४
कोट
कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे तक्रारी येत आहेत. समुपदेशातून प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात. महिलांनी कुटुंबाच्या प्रतिष्ठेला न घाबरता अन्यायाला वाचा फोडावी.
-अश्विनी वाकडे
पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर