विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेत अशा गैरप्रकारांना थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:23 IST2026-02-10T17:14:34+5:302026-02-10T17:23:51+5:30
कॉपीस मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद : कॉपीला आळा घालण्यासाठी पथके

Students, such misconduct in board exams will be directly subject to criminal charges.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्यास किंवा त्यास मदत करण्यास कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मंगळवार (दि. १०) पासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यातील ८८ परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
सुमारे ८० टक्के परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या परिसरात ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरीय समितीसोबतच दक्षता समित्या आणि भरारी पथके सक्रिय राहणार आहेत. यंदा कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
गतवर्षी काही केंद्रांवर कारवाई
मागील वर्षी दहावी तसेच बारावीदरम्यान, परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निलंबित तसेच केंद्रांवरही कारवाई करण्यात आली.
प्रत्येक केंद्रावर भरारी पथके
यंदा परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर भरारी पथक, बैठे पथक लक्ष ठेवून राहणार आहे. कॉपी करताना आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून ?
इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १२७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर इयत्ता १२ वीची बोर्ड परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणार असून, जिल्ह्यात ८८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.
बारावीसाठी २८ हजार ३०५ विद्यार्थी
जिल्ह्यात बारावीची ८८ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या केंद्रांतून २८ हजार ३०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षेत गैरप्रकार केल्यास फौजदारी गुन्हा
परीक्षेत कॉपी, मोबाईल वापर, प्रश्नपत्रिका बाहेर काढणे, उत्तरे पुरवणे किंवा त्यास मदत केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दोषींना अटक होऊन न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वर्गात सीसीटीव्ही, बाहेर ड्रोनद्वारे नजर
बहुतांश परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या माध्यमातून गैरप्रकारावर आळा घालण्यात येणार आहे.
जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना
जिल्ह्यात विविध भरारी पथके, समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. दक्षता समित्या अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध अधिकाऱ्यांच्या समित्याही परीक्षा केंद्रांना भेट देणार आहेत.
कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द
कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात परीक्षा मंडळांनी कडक नियमावली तयार केली आहे.