विद्यार्थिनींना मिळाले हक्काचे विश्रांती गृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:41+5:30
सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलींना उपलब्ध करून देण्यात आली.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : विश्राम गृह म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते व्हीआयपी, राजकीय पदाधिकारी यांच्यासाठी शासनाचे सर्व सोयीयुक्त गेस्ट हाऊस. मात्र हे विश्रांती गृह व्हीआयपीसाठी नसून जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विध्यर्थिनींना विश्रांती घेण्यासाठी आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा फाऊंडेशन यांच्या उपक्रमातून तयार केलेले विश्रांती गृह तयार झाले आहे. या विश्रांती गृहामुळे विद्यार्थिनींची मासिक पाळीच्या भीतीतून सुटका होणार आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिक्षण अनुकूल व्हावे आणि त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही या उपकमाची मुख्य उद्दिष्टये आहेत.
सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलींना उपलब्ध करून देण्यात आली.
याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामीण विद्यार्थिनींना सर्व सोयीयुक्त विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहे. हे विश्रांती गृह चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच पायलट उपक्रम आहे. या विश्रांती गृहामुळे विध्यार्थिनींच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.
हे विश्रांती गृह समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहयोगाने तयार झाले आहे. या विश्रांती गृहांचे बांधकाम विद्यार्थिनीच्या संख्येनुसार बनवण्यात येते.
२०० विद्यार्थिनींसाठी २२५ स्क्वेअर फूट तर दोनशेच्या पुढे संख्या असल्यास २५० स्क्वेअर फूट भागात बांधकाम करण्यात येते. या विश्राती गृहाला अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
विश्रांती गृहात या राहणार सुविधा
चिमूर तालुक्यातील लोहारा शाळेत तयार केलेल्या विश्राती गृहात स्टडी रूम, शौचालय, बाथरूम, चेंजिंग रूम, पुस्तके, सॅनिटरी पॅड, या सुविधा असून या ठिकाणी हेल्थ कॅम्पसुध्दा राबविण्यात येणार आहेत.
वाडा फाऊंडेशनद्वारे पालघर, भिवंडी परिसरात हे विश्रांती गृह दानदात्याच्या सहकार्याने तयार केले असून तिथे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा पायलट प्रोजेक्ट असून विद्यार्थिनींना भेडसावणारी पाळीची समस्या या विश्रांती गृहामुळे दूर होऊन उपस्थितीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. यामध्ये आरोग्य कॅम्पसुद्धा घेण्यात येणार आहेत.
-निशा पाटील
प्रोजेक्ट हेड, वाडा फाऊंडेशन, पालघर