आचारसंहिता संपली तरीही नोकरभरतीचा प्रश्न अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:01:16+5:30
त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
रोजगाराची प्रतीक्षा : उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली नोकरभरती सुरु झाली. त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अधीपासून संपूर्ण राज्यात विविध शासकीय कार्यालयामधील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हा परिषदेमध्येही मोठ्या प्रमाणात पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली. स्थानिक तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांनी आॅनालईन पध्दतीने अर्ज सादर केले होते. पुढील प्रक्रिया सुरू होणार तेवढ्यात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा रखडला. लेखी परीक्षा, मुलाखतीकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल आणि भरतीचा पुढील टप्पा सुरू होईल, अशी अपेक्षा या उमेदवारांना होती. प्रत्यक्षात आचारसंहिता संपुष्टात येईल २० दिवस उलटून गेले आहेत. परंतु, रखडेली भरती प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही.
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या काळात काम पाहणार आहेत. ही राजवट जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही, तो पर्यंत कायम राहणार आहे. म्हणजेच या काळात सर्वच कामे रखडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा नवीन सरकार स्थापन होण्याच्या प्रतीक्षेत अडकल्याचे चित्र आहे. राज्यात नवे सरकार स्थापना होऊन जनतेच्या आशा, अपेक्षांची पूर्तता व्हावी, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, राष्ट्रपती राजवट केव्हा संपुष्टात येईल, हे सांगणे तूर्तास कठीण आहे. मात्र, बेरोजगार तुरूणांना मोठ्या अपेक्षेने अर्ज केले. त्याची तयारीसुद्धा सुरु केली. मात्र परीक्षा व मुलाखत रोजगार कधी होणार, असा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे.
पाचशे ते हजार परीक्षा शुल्क
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध पदभरतीसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येते. पूर्वीच युवक बेरोजगार आहेत. त्यातही मोठे परीक्षा शुल्क, अर्ज करण्यास अतिरिक्त खर्च, परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेगळा खर्च असा एका अर्जासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येत असल्यामुळे अर्ज भरण्यास मोठी अडचण जात आहे.