अनेक गावांत कॅम्प : प्रति आधार कार्ड ३० रुपयांची वसुलीखडसंगी : नागरिकांची ओळख पटविण्याचे साधन म्हणून आधार कार्डची योजना कार्यान्वित केली व नंतर या आधार कार्डवर शासनाने सर्वसामान्यांना अनेक सवलतीकरिता आधार कार्ड अनिवार्य केले. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. याच आधार कार्डचे व्हेरीफिकेशन करण्याच्या नावावर चंद्रपूर येथील एका अॅकडमीकडून प्रति कार्ड ३० रुपये प्रमाणे वसूली केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा प्रकार सुरू आहे.आधार कार्ड सर्व नागरिकांना मोफत देण्यात आले आहे. आधार कार्ड काढण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीकडून काढण्यात आले. मात्र काही नागरिक, विद्यार्थी आधार कार्डपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्या महाआॅनलाईन केंद्रातून आजही आधारकार्ड काढणे सुरू आहे.आधार कार्ड सर्वसामान्यांच्या राशन कार्ड, गॅस सबसिडी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, केरोसीन आदी सवलतीसाठी ग्रामीण जनतेला उपयोगी येत आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र आधार कार्डचे व्हेरीफिकेशन करण्याच्या नावावर चिमूर तालुक्यात सचिन करिअर अकॅडमी चंद्रपूरच्यावतीने गावागावांत जाऊन प्रत्येक नागरिकांकडून ३० रुपये घेण्यात येत आहेत. याबाबत काही नागरिकांनी या बाबतचे परिपत्रक किंवा शासनाच्या आदेश दाखवा म्हटले, तेव्हा त्यांनी जे पेपर दाखविले ते बनावट असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला. तेव्हा याबाबत महाआॅनलाईनचे संचालक यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही कार्यक्रम शासनाकडून आला नसल्याचे सांगितले.सचिन कॅरिअर अकॅडमीचे कार्यकर्ते आल्यानंतर प्रथम ग्रामपंचायत सरपंच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत असून सरपंचाना ते पत्र दाखवून हा गोरखधंदा करीत आहेत. काही गावातील सरपंचाने याबाबत महसूल विभागाची विचारणा केली व असा कार्यक्रम शासनाचा नाही, असे सांगून हा कार्यक्रम राबविण्यात मज्जाव केला. मात्र काही गावातील सरपंचानी त्या प्रकाराची कुठलीही सत्यता न तपासता हा प्रकार सुरू केला आहे. नागरिकाची अशा प्रकारे होणारी लूट उघड्या डोळ्यांनी सरपंच व पदाधिकारी बघत आहेत. तेव्हा पुढारी हे गावकऱ्याचे प्रतिनिधी की, अशा बोगस एजन्सीचे, असा सवाल गावकरी करीत आहेत.चिमूर तालुक्यात आधारकार्ड व्हेरीफिकेशनचा कार्यक्रम खरोखखरच शासनाचा आहे की, बनावट याची सत्यता जनतेपुढे आणण्यासाठी महसूल विभागाने चौकशी करत या बोगस प्रकारावर आळा घालून जनतेची लूट थांबविण्याची मागणी अनेक गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
आधार पडताळणीच्या नावावर लूट
By admin | Published: February 11, 2016 1:28 AM