संजय धोटे : शेतकरी संवाद कार्यक्रमात घोषणा लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी समृद्ध, उन्नत, विकासित व अद्ययावत शाश्वत शेती करणे आवश्यक आहे. ही काळाची गरज असून ते आपले मिशन असावे. जिवती तालुक्याला कृषी पर्यटन विकासस्थळ निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. त्याकरिता आवश्यक तेवढे प्रयत्न करण्यात येतील, अशी घोषणा आमदार अॅड. संजय धोटे यांनी केली. आ अॅड. धोटे यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील आंबेझरी येथे जाऊन पिसाराम मडावी यांच्या शेताच्या बांध्यावर शेतकऱ्याशी बुधवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे टाटा ट्रस्टने निवडलेल्या आबेझरी गावातील सारिकाला अद्ययावत डाटा घेण्यासाठी संगणक देण्यात आले. त्यामुळे शासनाच्या ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीप हंगामामध्ये विकसित शेतीकरिता नियोजन करण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी व वीज पंपाचे उपलब्ध करून ‘मागेल त्याला विहीर’ द्यावी. आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात यावा. तसेच शेतीला पूरक जोडधंदा उभा करुन शेती विकासित करावी, असे आवाहन आ. धोटे यांनी केले. लघु उद्योग निर्माण केल्याने काय होईल ,शेतीचे उत्पन वाढण्यास कशी मदत होईल, आदी विषयांवर उपस्थित मान्यवर सदस्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्याच्या निर्देशही आमदार धोटे यांनी दिले. त्यांनी सिंचनाची अतिरिक्त कामे घ्यावी, अशी नागरीकानी सूचना केली. या सूचनेची दखल घेत सिंचनाची कामे करण्यात यावी, असे निर्देश संबंधिताना देण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सभापती गोदावरी केद्रे, जिवती प.स. उपसभापती महेश देवकते, तालुका भाजपा महामंत्री सुरेश केद्रे, इतर पदाधिकारी, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, आत्माच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी, तसेच विविध विभागाचे सहायक अधिकारी व शेतकरी, ग्रामस्थ, उपस्थित होते. शेतीच्या फायद्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही. त्यामुळे नवीन तत्रज्ञान अवगत करुन नियोजन करताना दूध संकलन केंद्र, इतर लघु उद्योग, बी-बियाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुनर्गठन, कर्जाची परतफेड, किसान क्रेडिट कार्ड वाटप, राज्य व केंद्राच्या विविध योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, पशुधनाकरिता चारा नियोजन आदी सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. त्यातून त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी आपली सेवा द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
जिवती तालुक्यात कृषी पर्यटन निर्माण करणार
By admin | Updated: May 19, 2017 01:14 IST