शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:28 IST2018-12-23T00:27:34+5:302018-12-23T00:28:22+5:30
मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.
माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, कामगार मेळावा व कृषी प्रदर्शन राजुरा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सत्कारमूर्ती माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुमन मामुलकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, वामनराव कासावार, देवराव भांडेकर, जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके, दत्तात्रय वेगिनवार, सुधाकर कुंदोजवार, श्रीधरराव गोडे, अॅड. मुरलीधरराव धोटे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, गजाननराव गावंडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, शिवचंद काळे, उत्तम पेचे, साईनाथ बुचे, वसंत मांढरे, तारासिंग, जि. प. सदस्य मेघा नलगे, अॅड. अरुण धोटे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानावरील स्टॉल लावले होते. यावेळी प्रगत शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. त्यानंतर मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, संचालन आनंद चलाख, प्रा. लाटेलवार तर आभार डॉ. संभाजी वरकड यांनी मानले.