लॉकडाऊन काळात गरिबांना मोफत धान्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:45+5:30
यावर्षी कधी नव्हे असे लोकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे लोण संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद्योगधंदे बंद झाले. यात रोजंदारी मजुरांचे हाल झाले. तब्बल तीन महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत केंद्र शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यात दोन लाख २२ हजार क्विंटल तांदळाचे वितरण झाले. यासोबतच १२ हजार क्विंटल डाळही वाटप करण्यात आली आहे. या धान्यांमुळे कोरोना संसर्गाच्या संकटकाळात हाताला काम नसलेल्या रोजंदारी मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होऊ शकला.
यावर्षी कधी नव्हे असे लोकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे लोण संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद्योगधंदे बंद झाले. यात रोजंदारी मजुरांचे हाल झाले. तब्बल तीन महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी सरकारला कार्डधारक व विनाकार्डधारकांनाही स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचे वितरण करावे लागले. जिल्ह्यात दररोज मजुरी करून त्यावर गुजराण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेत कुटुंबाचा गाडा तीन महिने कसाबसा हाकला. जिल्ह्यात ३६ हजार दारिद्ररेषेखालील कार्डधारक आहेत.
त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून दोन लाख २२ हजार क्विंटल तांदूळ व १२ हजार क्विंटल डाळ मोफत देण्यात आली आहे.
केशरी, शुभ्र कार्डधारकांनाही प्रतीक्षा
लॉकडाऊनच्या काळात केशरी आणि शुभ्र कार्डधारकांनाही मे आणि जून महिन्यांसाठी स्वस्त दरात राज्य शासनाने रेशनवरून धान्य उपलब्ध करून दिले होते. हा निर्णय दोन महिन्यांसाठीच होता. त्याची मुदत संपली आहे. सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. ते आणखी किती दिवस सुरू राहील याचा अंदाज नाही. यामुळे राज्य शासन आणखी काही महिने या योजनेला मुदतवाढ देईल, याची केशरी व शुभ्रकार्डधारकांनाही प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात एक नेशन एक रेशन
जिल्ह्यात एक नेशन - एक रेशन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. परराज्यातील कार्डधारकांना ‘नॅशनल पोर्टेबिलिटी’द्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिक राहात आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे, त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे, तितकेच धान्य संबंधिताला देण्यात येणार आहे. रेशन कार्ड नसले तरी संबंधिताला ‘नॅशनल पोर्टेबिलिटी’द्वारे बायोमेट्रिक पद्धतीने धान्य मिळणार आहे. संबंधित व्यक्तीला बायोमेट्रिकद्वारे त्याचे रेशन कार्ड दुकानाकडे उपलब्ध करता येणार आहे. कार्डवर एकूण किती लोक आहेत, त्यापैकी किती लोक जिल्ह्यात राहतात, तितक्याच लोकांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे या जिल्ह्यात उपलब्ध होईल. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित लोकांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. या सर्वांची नोंद आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.
कार्ड नसलेल्यांनाही ११,६०० क्विंटल तांदूळ
ज्यांच्याकडे कुठलेही कार्ड नाही. अशांना कोरोना संकटकाळात मे आणि जून महिन्यात मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. कार्ड नसलेल्या मजूरवर्गीय लोकांना ११ हजार ६०० क्विंटल तांदूळ व ६६० क्विंटल चना मोफत दिला आहे.
एक नेशन-एक रेशन योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. मागील तीन महिन्यात कार्डधारकांना दोन लाखांहून अधिक क्विंटल तांदूळ व १२ हजार क्विंटल डाळ मोफत देण्यात आली आहे
-राजेंद्र मिस्कीन,जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर