शेतकरी किडनी विकारी प्रकरण : रॅकेटचा सूत्रधार क्रिष्णा उत्तर प्रदेशात डॉ. माधव रेड्डी नावाने हेरायचा किडनी डोनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:17 IST2026-01-21T15:09:42+5:302026-01-21T15:17:26+5:30
Chandrapur : उत्तर भारतातून चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या तीन किडनी पीडितांच्या बयाणातून डॉ. क्रिष्णा हा त्यांच्याशी 'डॉ. माधव रेड्डी' या नावाने संपर्कात आला होता.

Farmer kidney disease case: Krishna, the mastermind of the racket, was a kidney donor in Uttar Pradesh under the name of Dr. Madhav Reddy
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उत्तर भारतातून चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या तीन किडनी पीडितांच्या बयाणातून डॉ. क्रिष्णा हा त्यांच्याशी 'डॉ. माधव रेड्डी' या नावाने संपर्कात आला होता. तिघांच्याही आर्थिक परिस्थितीचा व कर्जबाजारीपणाचा फायदा घेत १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून त्या तिघांची फेब्रुवारी २०२५ मध्ये त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटल येथे किडनी काढली. प्रत्यक्षात केवळ पाच लाख रुपयेच पीडितांना दिल्याचे तिघांनीही पोलिस बयाणात सांगितल्याची माहिती पोलिसांनी 'लोकमत'ला दिली.
अकुल शर्मा हा आयपीएल सट्ट्याच्या नादात कर्जबाजारी झाला होता. तर दिल्ली येथील नवीन साहू एका हॉटेलमध्ये कुक होता. त्याच्या आईला कॅन्सर असल्याने पैशाची गरज होती. तर उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील जावेद जुल्फकार हा कापड दुकानात नोकर होता. या तिघांनाही पैशाची गरज होती. हीच बाब हेरून रामकृष्ण सुंचू ऊर्फ डॉ. क्रिष्णा याने त्यांच्याशी डॉ. माधव रेड्डी या नावाने संपर्क करून १५ लाख रुपयांचे आमिष देऊन किडनी देण्यासाठी प्रेरित केले होते.
पीडितांची तक्रार त्रिची पोलिसांकडून बेदखल
१५ लाख रुपयांचे आमिष देऊन जावेद जुल्फकार, नवीन साहू, अकुल शर्मा यांची त्रिचीत किडनी काढली. मात्र त्यांना केवळ पाचच लाख रुपये दिले. उर्वरित पैशाची मागणी पीडितांनी डॉ. कृष्णाकडे व डॉ. राजरत्नम गोविंदसामी यांच्याकडे केली. मात्र त्यांनी टालवाटोलवी केली. त्यामुळे तिघांनीही त्रिची पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र त्यांची दखल घेतली नाही. नंतर त्रिचीतील आरोग्य विभागाच्या डायरेक्टरला भेटून आपबिती कथन केली होती. मात्र, कोणतीच कारवाई न करता तिघांनीही स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा एक लाख रुपये वाढीव मिळवून दिल्याचा आरोप तिन्ही पीडितांनी पोलिस बयाणात केल्याचे पोलिसांनी 'लोकमत'ला सांगितले.
स्वतःहून साधला चंद्रपूर पोलिसांशी संपर्क
चंद्रपूर किडनी प्रकरण प्रसारमाध्यमातून समोर आल्यानंतर तिन्ही पीडितांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क करून आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांनाही बोलावून बयाण नोंदवून घेतले.