अखेर अवैध रेती उपस्याने घेतला महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:01:05+5:30
सध्या पावसाचे दिवस असल्याने घरातील अंगणामध्ये चिखल झाले. त्यामुळे रेती टाकण्याच्या उद्देशाने ती वडीलासह, मुलांना घेऊन रेती आणण्यासाठी गेली होती. दरम्यान, पोत्यात रेती भरत असताना तिच्यावर दगड कोसळली. यामध्ये तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

अखेर अवैध रेती उपस्याने घेतला महिलेचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील राष्ट्रवादी नगरालगत असलेल्या नाल्याजवळ रेतीचे अवैध खनन केले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी याच खड्ड्यात रेती आणण्यासाठी गेलेल्या एका २७ वर्षीय महिलेवर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येल्याबाई शंकर कोडापे (२७) लखमापूर असे मृत महिलेचे नाव आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्याने घरातील अंगणामध्ये चिखल झाले. त्यामुळे रेती टाकण्याच्या उद्देशाने ती वडीलासह, मुलांना घेऊन रेती आणण्यासाठी गेली होती. दरम्यान, पोत्यात रेती भरत असताना तिच्यावर दगड कोसळली. यामध्ये तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
मागील अनेक दिवसांपासून येथील नाला परिसरात रेती तस्करांनी मोठ-मोठे खड्डे केले आहे. यातून शहरातील विविध भागात रेती पोहचविली जात आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पोलीस तसेच महसूल प्रशासनाकडे तोंडी तक्रारही केली आहे.
मात्र या तस्करांना मूकसंमती दिल्यानेच आजची घटना घडल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधला असता, सदर नाला परिसर सीटीपीएस परिसरात आहे. मात्र येथून रेतीतस्करी केली जात असल्याची अजूनपर्यंत आपल्यापर्यंत तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. जर येथून रेती तस्करी होत असेल तर तस्करांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्येही रेती तस्करी जोरात
राष्ट्रवादीनगर आणि लखमापूर दरम्यान मोठा नाल्या वाहतो. या नाल्याच्या शेजारी रेती तस्करांनी वाट्टेत तिथे खड्डे करून रेती तस्करी सुरु केली आहे. दरम्यान परिसरात जनावरे तसेच काही नागरिकही येथून जात असल्यामुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामात व्यक्त असतानाच रेती तस्करांनी संधीचे सोने करने सुरू केले आहे. विशेष म्हणजे, सदर जमिनीचा मालकीहक्क महावितरण कंपनीकडे असल्याची माहिती मिळाली आहे.
पाच हजारात एक ट्रॅक्टर
जिल्ह्यात रेती खनन तसेच उत्खनाला बंदी असल्याने रेती तस्करांनी आपले भाव चांगलेच वाढविले आहे. मिळेल तिथून रेती खनन करून गरजूंना मनमर्जीप्रमाणे रेती विक्री केली जात आहे. एका ट्रॅक्टरसाठी ५ हजारांपर्यंत ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
तक्रार करूनही फायदा नाही
या नाल्यातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी केली जात आहे. अनेकवेळा नागरिकांनी या ट्रॅक्टरचालकांना अडविले. मात्र या तस्करांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांचे हिम्मत आणखीच वाढत आहे.