दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:06 IST2026-02-12T18:05:00+5:302026-02-12T18:06:52+5:30
Nagpur : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवन, पर्यावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता अत्यंत धोकादायक आहे.

Durgapur coal mine expansion is dangerous for human life; Demand not to approve the expansion
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवन, पर्यावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या विस्ताराला कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाऊ शकत नाही, असा दावा अॅड. महेश धात्रक यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये संबंधित जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान केला.
पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या प्रकृती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी खाण विस्ताराविरुद्ध याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अॅड. धात्रक यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडताना खाण विस्ताराची अवैधता सिद्ध करण्यासाठी विविध मुद्दे मांडले. सर्वोच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पावरील निर्णयामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विविध दिशानिर्देश दिले आहेत. दुर्गापूर खाणीचा विस्तार या निर्णयाची पायमल्ली करतो. खाणीचा १२१.५८ हेक्टर वनजमिनीवर विस्तार केला जाणार आहे. विस्तारामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र व शांतता क्षेत्र धोक्यात येईल. वाघांनी या परिसरातील अनेक व्यक्तींचे जीव घेतले आहेत, असेही अॅड. धात्रक यांनी सांगितले. न्यायालयाने १३ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
नागरिकांना जगण्याचा मूलभूत अधिकार
वेकोलिने खाण प्रभावित क्षेत्रामध्ये आवश्यक वृक्षारोपण केले नाही. प्रदूषित पाणी मोटघाट नाल्यामध्ये सोडले जाते. त्यामुळे इरई नदी प्रदूषित होत आहे. याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिला नोटीस बजावली आहे. राज्यघटनेने नागरिकांना जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्यानुसार नागरिकांना शुद्ध वायू व पाणी मिळणे आवश्यक आहे, याकडेही अॅड. धात्रक यांनी लक्ष वेधले.