'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:52 IST2025-10-18T12:50:21+5:302025-10-18T12:52:25+5:30
Chandrapur : गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती.

'Chief Minister, My School, Beautiful School' competition to be held; Third phase announced, schools across the state ready again
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील शालेय शिक्षणात गुणवत्ता, नवचैतन्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३' या स्पर्धात्मक अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. उशिरा का होईना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षात म्हणजे, फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्पर्धेचा निकाल लागणार आहे.
गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती. या पार्श्वभूमीवर योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली आहे. हे अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. यापूर्वी या योजनेचे टप्पा-१ (२०२३-२४) आणि टप्पा-२ (२०२४-२५) हे दोन्ही टप्पे यशस्वी ठरले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून शाळांमध्ये लोकसहभाग वाढविण्यात आला होता.
पहिल्या टप्प्यात जवळपास २ कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते. 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्येही काही उपक्रमांची नोंद झाली होती. दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील हजारो शाळांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या शाळांना रोख पारितोषिक देऊन शाळांच्या गरजेनुसार त्याचा विनियोग करण्याची मुभा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे, त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधणे आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
सहभागासाठी आवाहन
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शाळांना केवळ आर्थिक लाभच नाही तर एक सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार करण्यासही मदत होणार आहे.