रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताचा आणखी एक बळी, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 17:13 IST2021-10-22T16:48:25+5:302021-10-22T17:13:23+5:30
एका कार्यक्रमासाठी मुलासोबत दुचाकीने जात असताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ घडली.

रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताचा आणखी एक बळी, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
चंद्रपूर : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डेअपघातासाठी कारणीभूत ठरत असून या खड्ड्यांमुळे एका महिलेला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली. पदमा सुधाकर मादनेलवार(५०) रा. गोवरी ता.राजुरा असे मृत महिलेचे नाव आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथून तेलंगणा राज्यात एका कार्यक्रमासाठी मुलगा चंद्रशेखर मादनेलवार व त्यांची आई पदमा मादनेलवार सकाळी दुचाकीने निघाले. दुचाकीने मुलासोबत जात असताना सोंडो गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पदमा मादनेलवार दुचाकीवरून खाली कोसळल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यांना देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोवरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची स्थिती जैसे थेच असल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. हे खड्डे अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असूनही यावर काहीच उपाय का केला जात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.