इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:36 IST2019-08-04T00:35:49+5:302019-08-04T00:36:24+5:30
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील किटाळी, भटाळी यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. प्रशासन मदतीसाठी सज्ज झाले आहे.
सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. चारगाव धरण ५० सेंटीमीटरने ओसंडून वाहत आहे. परिणामी इरई धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होत आहे. धरणात २०७.५ मीटरपर्यंत पाण्याचा संचय होऊ शकतो. मात्र धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली नाही. या पाण्यामुळे इरई नदी ओसंडून वाहत आहे. किटाळी व भटाळी गावात पाणी शिरले आहे. धरणाचे सातही दरवाजे उडल्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वत:, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंतही इरई धरणाचे दरवाजे उघडेच होते.
नेरी परीसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला
नेरी : परिसरात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरी परिसरातील उमा नदीला पूर आला आहे. यामुळे गोदेंडा ,वडसी, विहीरगाव, पडसगाव, लोहारा- बोडधा, सरडपार, म्हसली या गावांचा संपर्क नेरीसोबत तुटलेला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील वडसी येथील अनेक घरांची पडझड झालेली आहे. केवड कुसन मेश्राम, वंदना डोमडू सुर्यवंशी, अस्मत खा पठाण, सुनील हरीदास मेश्राम, रमेश सित्रु आत्राम, अविनाश श्रीहरी मेश्राम यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.