आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सफर; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:20 IST2017-12-16T11:19:35+5:302017-12-16T11:20:24+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़

Adiwasi students visit to Maharashtra; Police Administration Initiative | आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सफर; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सफर; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील ८४ विद्यार्थ्यांचा सहभाग

वसंत खेडेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़
शहरातील प्रशस्त रस्ते, उद्यान, शोभीवंत इमारती, सोयीसुविधा आणि चकचकीतपणा बघून दीपून गेले. हे सारे दृश्य बघितल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात अशा सोईसुविधा कधी येणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला़ एटापल्ली तालुक्यातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न उमटले़ अतिदुर्गम भागातील १४ ते१८ वयाचे एकूण ८४ विद्यार्थी- विद्यार्थिनी  महाराष्ट्र दर्शनावर निघाले आहेत. मंगळवारी बल्लारपूरला दाखल झालेत़ बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना एका विद्यार्थिनीने विचार करायला लावणारा हा प्रश्न उपस्थितांसमोर मांडला़ अन्य विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शहराविषयीचे कुतूहल जागृत केले़  महाराष्ट्र दर्शन आमच्याक़रिता अगदी नवीन आणि मनात आत्मविश्वास जागविणारा आहे़ नवे जग प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभव घेण्याचा आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले़ त्यातील बहुतेक विद्यार्थी स्वत:चे गाव सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांच्यात काहीसा बुजरेपणाही दिसून येत होता. मात्र, या सफरीने ते आनंदीत झाले होते़ एका विद्यार्थ्यांने आपले अनुभव इंग्रजीतून कथन केले. पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले़ गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची ही सफर महाराष्ट्र दर्शनासाठी निघाली आहेत़ विद्यार्थ्यांसोबत गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अनिल तांदोळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख आदी सहभागी झाले आहेत. पोलीस आणि आदिवासी विकास विभागाकडून या सहलीचे आयोजन करण्यात आले़ विद्यार्थ्यांनी पुस्तकातून जे वाचले ते त्यांनी प्रत्यक्ष बघावे़ मुख्य प्रवाहात मिसळावे, हा या सहलीचा मुख्य उद्देश असल्याचे तांदोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांची ही सफर २१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र भ्रमण करणार आहे. चंद्रपूर, ताडोबा, शेगाव, नागपूर, आणि पेंच प्रकल्पालाही भेट देणार आहेत़ ही १७ वी सफर असून आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र दर्शन सहलीत सहभागी झाले आहेत़


विद्यार्थ्यांचे बल्लारपुरात स्वागत
या सफरीत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी दिसलेत. बल्लारपुरातील पोलीस ठाण्यात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले़ यावेळी ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता़ आदिवासी बोलीतील गीत सुरू करताच विद्यार्थ्यांनी तालसुरात आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली़

Web Title: Adiwasi students visit to Maharashtra; Police Administration Initiative