चंद्रपूर-वर्धा जिल्ह्यातील ४५० करोडची शासकीय कामे ठप्प

By Admin | Updated: March 1, 2016 00:37 IST2016-03-01T00:37:59+5:302016-03-01T00:37:59+5:30

रॉयल्टीचे कागदपत्र नसल्यास पाचपट दंड आकारण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संतप्त झालेले शासकीय कंत्राटदार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

450 crore government work in Chandrapur-Wardha district | चंद्रपूर-वर्धा जिल्ह्यातील ४५० करोडची शासकीय कामे ठप्प

चंद्रपूर-वर्धा जिल्ह्यातील ४५० करोडची शासकीय कामे ठप्प

कंत्राटदार बेमुदत संपावर : जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने संताप
चंद्रपूर: रॉयल्टीचे कागदपत्र नसल्यास पाचपट दंड आकारण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संतप्त झालेले शासकीय कंत्राटदार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे चंद्रपूर-वर्धा जिल्ह्यात सुरू असलेली ४५० करोड रुपयांयाची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हिटलरशाहीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप चंद्रपूर सर्कल बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय जयस्वाल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, संपूर्ण राज्यात हा नियम कुठेही नाही. केवळ चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी हा नियम लावण्यात आला आहे. या नियमानुसार ज्या ठेकेदाराकडे बांधकामाच्या साहित्याच्या रॉयल्टीची कागदपत्रे नसतील त्या ठेकेदाराकडून पाचपट दंड वसुल करण्यात येणार आहे. करारनामा करताना या बाबीचा कुठेही उल्लेख नाही. आता दबाव आणल्या जात असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. यावर्षी विविध विकास कामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. परंतु सदर निधी खर्च न होता तो परत शासनाच्या तिजोरीत जमा व्हावा, अशी निती प्रशासनाकडून आखल्या जात असल्याचे जयस्वाल म्हणाले. यासंदर्भात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, हा नियम कंत्राटदारावर अन्यायकारक असल्याची बाब त्यांनी मान्य केली. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील बंद झालेली कामे
कंत्राटदारांच्या या आंदोलनामुळे वरोरा नाका उड्डाण पूल, वरोरा नाका कॉंक्रीट मार्ग, मूल येथील कॉंक्रीट मार्ग, पोंभूर्णा येथील कॉंक्रीट मार्ग, नियोजन भवन चंद्रपूर, धानोरा-भोयगाव कॉंक्रीट मार्ग, गडचांदूर, कोरपना डांबरीकरण, दुर्गापूर कॉंक्रीट मार्गाचे काम ठप्प झाले आहे.
कंत्राटदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के.बालपांडे यांना विचारणा केली असता, काही वेळापूर्वीच संप मिटल्याचा संदेश आपल्याला मिळाल्याचे सांगितले. बाबत जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, कंत्राटदारांशी चर्चा सुरू असून त्यातून काही तरी चांगला मार्ग निघेल, असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Web Title: 450 crore government work in Chandrapur-Wardha district