सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा
By निलेश जोशी | Updated: October 21, 2023 23:45 IST2023-10-21T23:45:06+5:302023-10-21T23:45:15+5:30
भारतीय सैन्यदलामध्ये टेलीपोन ऑपरेटर म्हणून अक्षय लक्ष्मण गवते हे ३० डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झाले होते.

सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा
पिंपळगाव सराई: अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच अग्नीवरी म्हणून भारतीय सैन्यदलात रुजू झालेल्या येथील अक्षय लक्ष्मण गवते (२३) यांचा सियाचीनमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पार्थिवार २३ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय सैन्यदलामध्ये टेलीपोन ऑपरेटर म्हणून अक्षय लक्ष्मण गवते हे ३० डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झाले होते.
पहिल्या कर्तव्यालाच त्यांना सियाचीन सारखे ठिकाण मिळाले होते. दरम्यान २० ऑक्टोबर रोजी रात्री त्यांना अचानक त्रास झाल्याने त्वरित ४०३ फिल्ड रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुत्रांनी सांगितले. त्यांचे पार्थिव जम्मू काश्मिरमधून दिल्ली येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोहोचेल.
तेथून दुपारी औरंगाबादला आणण्यात येईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला पिंपळगाव सराई येथील त्यांच्या मूळ गावी पार्थिव आणण्यात येऊन तेथे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले. मृत जवान अक्षय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे आईवडील हे शेती करतात. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे.