'त्या' पुलाचे बांधकाम कधी होणार?
By Admin | Updated: January 8, 2016 01:01 IST2016-01-08T01:01:12+5:302016-01-08T01:01:12+5:30
पहेला ते गोलेवाडी रोड नाल्यावरील १५ ते २० वर्षापासून पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे.

'त्या' पुलाचे बांधकाम कधी होणार?
बांधकाम रखडले : पहेला ते गोलेवाडी मार्गावरील प्रकार
भंडारा : पहेला ते गोलेवाडी रोड नाल्यावरील १५ ते २० वर्षापासून पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकरिता संबंधित विभागासी विविध प्रकारचा पत्रव्यवहार, निवेदने, ठराव आदी सर्व प्रकारचे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त्याकडे हेतुपरस्पद दुलर्क्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत संबंधित विभागाशी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सदर काम सुरू करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसे खुर्द विभाग या दोन्ही विभागाचे योग्य ताळमेळ जुळत नसल्यामुळे कामसुरू करण्यासाठी अडसर निर्माण होत असल्याचे सर्व स्तरावरून बोलल्या जात आहे. काम सुरू करण्यासंदर्भात दोन्ही विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा काम सुरू करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. सदर पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीसाठी सदर मार्गाने गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी गावावरून नागरिक येणे जाणे करतात.
पहेला हीच परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापाऱ्यांना खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच पहेला येथे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे.
रस्त्यावरून जाता येताना अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रात्रीच्या वेळेस जाण्या येण्यास नागरिकांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर नाल्याला पूर आल्यानंतर ४-४, ५-५ दिवस रस्ता बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच व्यापारी वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम येत्या १० दिवसात तत्काळपणे सुरू करण्यासंदर्भात गोलेवाडी व मिन्सी ग्रामपंचायतच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांना निवेदन देण्यात आले. सोबतच तत्काळपणे सुरू काम न केल्यास गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री इत्यादी येथील सर्व नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सुद्धा देण्यात आला असलेला तरी सदर पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम कधी होणार, असा प्रश्न पडलेला आहे. (प्रतिनिधी)