कुटुंबांनी केले नेत्रदान : अल्पशा आजाराने मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते. भारतामध्ये अंदाजे कोट्यवधी माणसे आंधळी आहेत. पैकी ६० टक्के बारा वषार्खालील मुले आहेत. रोज हजारो माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतात. पण त्यापैकी फक्त काहीजण नेत्रदान करतात. अशाच एका आॅटोचालकाच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदान करून त्यांना नेत्ररूपी जिवंत ठेवले आहे.संजय श्रीराम बांते असे मृत आॅटो चालकाचे नाव आहे. भंडारा शहरातील शितला माता मंदिरजवळील बजरंग चौकात राहणारे व्यवसायाने आॅटोचालक होते. त्यांचा पत्नी आशा व १२ वर्षाची श्रेया व १० वर्षाची रिया असा संसार होता. शहरातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी ने-आण करणाऱ्या संजयने व्यवसायातून अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. कुटुंबाचा गाडा सुरूळीत सुरू असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अल्पआजारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हातावर आणुन पानावर खाणाऱ्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले. संजयच्या आकस्मिक मृत्यूने पत्नी व मुलींनी हंबरडा फोडला. धकाधकीचे जीवन जगणाऱ्या बांते कुटुंबावर तर आभाळ कोसळले. या दु:खातून सावरण्यासाठी पत्नीला आप्तस्वकीयांनी त्यांना धीर दिला. संजय अचानक सर्वांना सोडून निघून गेल्याने तो नेत्ररूपी जीवंत रहावा व त्याच्या डोळ्यांनी अंधत्व आलेल्यांना जग बघता यावे, यासाठी कुटुंबीयांनी संजयचे नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार नेत्रपेढीशी संपर्क साधून संजयची नेत्रदान प्रक्रिया पार पाडली. वेगवेगळ्या कारणांमुळे अंधत्व येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मधुमेह हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. या पाश्वभूमीवर नेत्रदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहारत वर्षाला हजारोंचा मृत्यू होतो. मात्र, त्यात बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्तींचे नेत्रदान होते. अशास्थितीत आॅटोचालक म्हणून प्रवाशांसाठी दिवसरात्र एक करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजयच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी घेतलेला नेत्रदानाचा पुढाकार सर्वांसमोर आदर्शवत ठरला आहे.अर्ज भरला नसला तरी नेत्रदानमरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.
आॅटोचालक संजय मृत्यूनंतर ठरला ‘दृष्टिदाता’
By admin | Published: May 16, 2017 12:25 AM