मालवाहतूक रेल्वे गाड्या धावताहेत ‘ओव्हरलोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:35 IST2019-04-18T00:32:28+5:302019-04-18T00:35:00+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर २४ तासात सुमारे १८० मालवाहतूक रेल्वे धावतात. मालवाहतूक रेल्वे गाड्या ओव्हरलोड धावत असून कोळशाच्या वाघीणी तर काठोकाठ भरलेल्या असतात. त्यामुळे कोळसा रेल्वे मार्गावर सांडून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

मालवाहतूक रेल्वे गाड्या धावताहेत ‘ओव्हरलोड’
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर २४ तासात सुमारे १८० मालवाहतूक रेल्वे धावतात. मालवाहतूक रेल्वे गाड्या ओव्हरलोड धावत असून कोळशाच्या वाघीणी तर काठोकाठ भरलेल्या असतात. त्यामुळे कोळसा रेल्वे मार्गावर सांडून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई हावडा रेल्वे मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. छत्तीसगड तथा ओडीसा राज्यातून कोराडी, खापरखेडा, पारस येथे मोठ्या संख्येने दररोज कोळसा घेऊन वाघीणी जातात. मालडब्यापर्यंत (शिगेपर्यंत) कोळसा भरला असतो. ताशी ७० ते ९० किमी अशी गती रेल्वे मालवाहतूक गाड्यांची असते. त्यामुळे अनेकदा कोळसा रेल्वे रुळाशेजारी पडतो. जेथे रेल्वे फाटक असते तेथे वाहन धारक उभे असतात. मालगाडीतील कोळसा वाहनधारकावर पडून अपघाताची भीती आहे.
दगडी कोळसा असल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे. रेल्वे एक समान गतीने जात असली तरी कमी अधिक गतीमुळे मालवाहतूक डब्ब्यांना निश्चितच झटके लागतात. शिगेपर्यंत डबे भरले असतात. नियमानुसार त्यावर कापडी अथवा प्लास्टीक आच्छादन घालून वाहतूक करणे आवश्यक आहे. याकडे रेल्वे प्रशासन मात्र दुर्लक्ष करते. साधे मालवाहतूक ट्रकना ओव्हरलोड वाहतूक करता येत नाही तोच रेल्वेलाही नियम आहे. परंतु सर्वसामान्यांचे त्याकडे लक्ष जात नाही. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न वरिष्ठांना विचारा असे उत्तर दिले.
एकदाही कारवाई नाही
शेकडो किमीचे अंतर मालवाहतूक गाड्या पार करतात. यात कोळसा शिगोशीग भरलेला असतो. रेल्वेचे स्वतंत्र तपासणी नेटवर्क आहे. अधिकाऱ्यांचे पथक आहे. परंतु आतापर्यंत कारवाई झाली नाही. मालवाहतूक गाड्या यार्डातून रवाना होताना त्याचे वजन केले जाते. गंतव्य स्थळीही पुन्हा वजन करण्यात येते. मात्र ओव्हरलोड प्रकरणाकडे कुणाचेही लक्ष नाही.