पालांदूर येथील बागायती शेतकरी होत आहेत हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:00 AM2021-03-02T05:00:00+5:302021-03-02T05:00:49+5:30
शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास घेऊन एकमेकांच्या सहयोगातून सुधारतो आहे. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी पारंपरिक अभ्यासासोबत नव तंत्रज्ञान स्वीकारीत आहेत. पीक जोमदार यावे, यासाठी नव्या तंत्राचे सहकार्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. एकट्या पालांदूर येथे सुमारे २०० एकर जागेत बागायती शेती केली जाते. यात विविध पिके उत्पादित केली जातात.
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : नव्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करत नवे काही करण्याच्या प्रेरणेने पालांदूर येथील शेतकरी हायटेक होत आहेत. मल्चिंग, ड्रीपसोबत आता कागदी आवरण पिकांना देत पीक संरक्षणाकरिता शेतकरी सरसावलेला आहे. क्राप कव्हरमुळे पिकांना किडीपासून व उन्हापासून थेट संरक्षण मिळत आहे.
शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास घेऊन एकमेकांच्या सहयोगातून सुधारतो आहे. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी पारंपरिक अभ्यासासोबत नव तंत्रज्ञान स्वीकारीत आहेत. पीक जोमदार यावे, यासाठी नव्या तंत्राचे सहकार्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. एकट्या पालांदूर येथे सुमारे २०० एकर जागेत बागायती शेती केली जाते. यात विविध पिके उत्पादित केली जातात. चुलबंद खोरे भाजीपाला उत्पादनाकरिता जिल्ह्यात परिचित आहे. चुलबंद खोऱ्यात पालांदूर, मऱ्हेगाव, वाकल, नरव्हा, पाथरी, खोलमारा, भुगाव, विहीरगाव, ढिवरखेडा आदी गावांत बारमाही भाजीपाल्याची शेती केली जाते. शेतकरी थेट बीटीबी सब्जी मंडी येथे जोडला आहे. दररोज हजारो किलो भाजीपाला संपूर्ण जिल्ह्याला चुलबंद खोऱ्यातून पुरविला जातो. भाताची शेती कमी करून बागायती शेतीकडे लक्ष वाढविलेले आहे. मिरची, कारले पीक लावले आहे. या पिकाला पांढऱ्या माशीपासून संरक्षण मिळण्याकरिता क्राप कव्हर लावलेले आहे. सरळ पंचेचाळीस दिवसांपर्यंत या पिकाला क्राप कव्हरमध्ये सुरक्षा मिळणार आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याने नवे काही करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे शेतकरी टिकाराम भुसारी यांनी सांगितले. खर्च कमी व्हावा, फवारण्या अधिक होऊ नये. विषमुक्त भाजीपाला उत्पादित व्हावा याकरिता नव्या तंत्रात क्राप कव्हर खरेदी करून लावलेले आहे. एका झाडाला सुमारे सहा ते सात रुपये एवढा खर्च क्राप कव्हरसाठी आलेला आहे. यामुळे कीड व उन्हापासून संरक्षण मिळून पीक जोमदार येईल, अशी आशा आहे, असे सतीश भुसारी या शेतकऱ्याने सांगितले.